
पुणे ः भारत सरकारच्या ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने अर्थात सीजीएमसीपीने जनुकीय सुधारित मोहरी (GM Mustard) वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आणि पुन्हा वादाला (Controversy Over GM Mustard) तोंड फुटले. अनेक शास्त्रज्ञ आणि जाणकार या वाणाच्या वापरास विरोध करत आहेत.
देशातील खाद्यतेलाची टंचाई लक्षात घेऊन आणि सध्याच्या वाणांची स्थिती पाहता अनेक शास्त्रज्ञ जीएम मोहरीच्या वाणाला तातडीने परवानगी देण्याची मागणी करत आहेत. हवामान बदल आणि वाढती लोकसंख्या पाहता अन्नसुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुधारित जीएम वाण असणे गरजेचे असल्याचे मत हे शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
साउथ एशिया बायोटक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी जीएम वाणाला होणारा विरोध हा अतिशयोक्ती वाटतो, असे सांगितले. देशात मागील दोन दशकांपासून बीटी कापसाचे उत्पादन घेतले जाते. बीटी कापसामुळे कोणतीही आरोग्यविषयक किंवा पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या नाहीत. तसंच आपण जीएम तेलबिया पिकापासून तयार केलेल्या खाद्यतेलाची आयात करून खातच आहोत.
मग देशातील शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान देण्यात काय अडचणी आहेत, असा प्रश्नही डॉ. मायी यांनी उपस्थित केला. मात्र दुसरीकडे काही जण जीएम वाणाला विरोध करत आहेत. जीएम वाणामुळे अन्नसुरक्षा, जैवविविधता आणि आरोग्यालाही धोका असल्याचे मत काही शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. परवानगी मिळालेली डीएमएच-११ हे वाण तणनाशक सहनशील आहे.
म्हणजेच शेतकऱ्यांना मोहरी पिकावर तणाशक फवारण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकाचा जास्त वापर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाल्यास तणही तणनाशकाला प्रतिरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास ‘सुपर तण’ तयार होऊ शकते. तसेच जीएम पिकांमध्ये तणनाशकाचे अवशेष येऊ शकतात, असे सांगत या वाणाला विरोध केला जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने जीएम वाणाच्या प्रसारणास विरोध केला आहे. स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक आश्विनी महाजन यांनी जीएम मोहरीच्या वाणाला अंतिम संमती न देण्याची मागणी केली. मोहरीचे हे वाण मानवी आरोग्य आणि शेतकऱ्यांसाठी हानिकारक असल्याचे महाजन यांनी सांगितले.
‘अलायन्स फॉर सस्टेनेबल ॲण्ड होलीस्टिक ॲग्रिकल्चर’ या संस्थेच्या संस्थापक कविता कुरूगंटी यांनी हे जीएम वाणाच्या महत्त्वाच्या मोहरी उत्पादक राज्यांमध्ये चाचण्या घेतल्या नसल्याचे सांगितले. तसेच ज्या चाचण्या झाल्या त्या सर्व जैवसुरक्षा मापदंडानुसार झालेल्या नाहीत. २०१७ मध्ये या वाणाच्या चाचण्यांवर जे आक्षेप घेण्यात आले होते त्याचे निराकरण झालेले नाही. जनुकीय सुधारणा प्रक्रियेचा आरोग्यावर परिणाम होतो, असेही कुरुगंटी यांनी सांगितले.
मोहरी वाणाच्या विरोधातील दावे
- डीएमएच-११ वाणाच्या पूर्ण चाचण्या झाल्या नाहीत.
- या मोहरी वाणाच्या चाचण्या महत्त्वाच्या मोहरी उत्पादक राज्यांमध्ये घेण्यात आल्या नाहीत.
- ज्या चाचण्या घेतल्या त्यात जैविक मापदंडाचे पालन झाले नाही.
- पर्यावरण प्रसारणाला परवानगी देताना सीजीएमसीपीने दोन वर्षे पुन्हा प्रक्षेत्र चाचण्यांची शिफारस केली आहे. म्हणजेच या वाणाचे पूर्णपणे परीक्षण झालेले नाही.
- मधमाश्यांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करावा लागणार आहे.
- दावा केल्याप्रमाणे उत्पादकता प्रत्यक्षात मिळत नाही. वरुणा वाणापेक्षा डीएमएच-११ वाणाची उत्पादकता जास्त नाही.
- तणनाशकाचा अतिरिक्त वापर होईल.
- मानवी आरोग्यास अपायकारक.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.