
डोंबिवली : परतीच्या पावसाचा मोठा फटका कडधान्य उत्पादनाला (Pulse Production) बसल्याने डाळींच्या किमती वधारल्या आहेत. तूर आणि उडीद डाळीच्या किमती या शंभरीच्या पार गेल्या आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त झालेल्या दिवाळीत डाळीची मागणी जास्त होती.
त्या वेळी आवक तेवढी नसल्यामुळे डाळीच्या दरात वाढ झाली होती; मात्र दिवाळीनंतरदेखील डाळीचे दर ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बाजारात आहे. परतीच्या पावसामुळे डाळीच्या पिकाचे नुकसान झाले; त्यामुळे पिकात पाच टक्के घट झाली आहे. परिणामी, डाळीच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान झाले.
सध्या मटकीचा हंगाम असतानादेखील दर वाढलेले आहे. आवक वाढल्याने ६० रुपये किलोपर्यंत मटकीचे दर आले होते; मटकीचे दर कमी होऊ नये, यासाठी दलालांनी साठेबाजी केल्याने मटकीच्या दरात वाढ झाली आहे.
उडीद डाळीच्या किमती १०० रुपये प्रतिकिलो पार गेलेली असून, तूर डाळ ही ९८ रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचली आहे. मूग डाळदेखील ९५ रुपये, तर मसूर डाळ ७२ रुपये प्रतिकिलो आहे. या आठवड्यात डाळीच्या किमती या सहा ते सात रुपयांनी वाढलेल्या आहेत. या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे.
- भुवन सिंग, विक्रेता
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.