Amravati News : दिवाळीपासून आवक वाढल्याच्या परिणामी अवघ्या एक हजार ते १२०० रुपये क्विंटल असलेल्या हिरव्या मिरचीच्या दरात आता सुधारणा होत हे दर ४५०० ते ५००० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याच्या परिणामी दरात सुधारणा झाल्याची माहिती राजूरा बाजार येथील मिरची व्यापारी मुन्ना चांडक यांनी दिली. यापुढील काळात मिरची दर आणखी वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरुड तालुक्यातील राजूरा बाजार ही हिरव्या मिरचीची उलाढाल होणारी मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात रात्री खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. याच बाजारातून देशभरात हिरव्या मिरचीचा पुरवठा होतो. मात्र २०२३ या वर्षातील दिवाळीपासून बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर दबावात आले. १००० ते १२०० रुपये क्विंटलचा दर हिरव्या मिरचीला मिळाला. परिणामी शेतकऱ्यांनी हिरव्या ऐवजी लाल मिरची विकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय फायद्याचाही ठरला.
सद्यःस्थितीत लाल (वाळलेल्या) मिरचीला १५ ते १६ हजार रुपयांचा दर मिळत आहे. परिणामी राजूर बाजार येथील हिरव्या मिरचीची आवक ठप्प झाल्याने हा बाजारच बंद पडला. दरम्यान, आता तापमानात वाढ होत असल्याने हिरव्या मिरचीची देखील मागणी वाढली आहे. तुलनेत आवक कमी असल्याने हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे.
परिणामी अमरावती बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ५००० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मिरचीची आवक अवघी ५० क्विंटल होती. खुल्या बाजारात हिरवी मिरची ५५ ते ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.