वसई : पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांवर आर्थिक संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) मासेमारी करणे कठीण झाले. अशातच चविष्ट पापलेट समुद्रात दुर्मिळ झाले आहे; तर सुकी मासळी (Dry Fish) बाजारात दाखल झाली आहे, पण आवक कमी झाल्याने त्याचे दरदेखील वाढले आहेत.
पालघर जिल्ह्यात सातपाटी, डहाणू, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर यांसह विविध भागांतील समुद्र किनाऱ्यांवर सुक्या मासळीचा मोठा व्यापार चालतो. हे सुकवलेले मासे चार ते पाच महिने टिकतात. आदिवासीबहुल क्षेत्रात सुक्या मासळीला अधिक मागणी असते.
चवीला उत्तम असलेली सुकी मासळी साठवणूक करून ठेवली जाते. हिवाळ्यात सुकवून ठेवलेल्या मच्छीचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे मंडई, आठवडी बाजार, शहरात भरणारे बाजार आदी ठिकाणी मांदेली, करंदी, बोंबील, वाकटी, पाखट, बांगडा, दाडा, जवळा, सुकट आदी प्रकारची सुकी मासळी दिसून येते, पण लांबलेल्या पावसामुळे काही ठिकाणी सुकवत ठेवलेल्या मासळीचे मोठे नुकसान झाले होते.
त्यामुळे ही मासळीदेखील कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारभाव वाढला आहे. पालघर जिल्ह्यात पापलेटला चांगली मागणी असते. हॉटेल, उपाहारगृह, रिसॉर्ट मालाकांसह खवय्ये पापलेट खरेदीसाठी गर्दी करतात, परंतु यंदा चविष्ट दालदा फिशिंग पापलेटची ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे आवक कमी झाली आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.