
Pune News : सोयाबीनची खरेदी सरकारने थांबवली की मुदतवाढ दिली? याबाबत संभ्रम आहे. कारण खरेदीची मुदत १२ जानेवारीला संपली. मात्र सरकारने अद्यापही लेखी मुदतवाढ दिली नाही.
त्यामुळे आज राज्यातील खेरदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी बंद आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मुदतवाढ दिल्याचे तोंडी सांगितले होते. पण लेखी मुदतवाढ अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.
राज्यातील सोयाबीन खरेदी सुरुवातीपासूनच धिम्या गतीने सुरु होती. राज्यातील तब्बल ७ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन प्रत्यक्ष खरेदी झाले. आजही तब्बल ५ लाखांवर शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत. सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ दिली होती. पण खरेदीला मुदतवाढ दिली नाही.
खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा जवळपास एक हजाराने कमी आहे. त्यामुळे शेतकरी किमान हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा बाळगून आहेत. त्यासाठी नोंदणी करून सोयाबीन घरात साठवून ठेवले. पण अचानक खरेदी बंद झाली आणि मुदतवाढीविषयी संभ्रम असल्याने शेतकऱ्यांचीही अडचण झाली आहे. शेतकरी मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत.
राज्यात जेवढ्या शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली त्यापैकी केवळ ३० टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. तर एकूण उद्दीष्टाच्या केवळ ३१ टक्क्यांपर्यंत खरेदी झाल्याचे पणन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यातील सोयाबीन उत्पादकांची सरकारने सुरुवातीपासून फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
सरकार सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या सर्व सोयाबीनला हमीभाव देऊ, असे आश्वासन देत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन ६ हजारांचा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मोदी यांच्या आश्वासनाप्रमाणे ६ हजारांचा भाव तर मिळत नाही. पण सरकारने जाहीर केलेला ४ हजार ८९२ रुपये देखील मिळत नाही. सरकारने केवळ उद्दीष्ट जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन घ्या
राज्यातील नोंदणी केलेले ५ लाख शेतकरी सोयाबीन खेरदीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणी करून सोयाबीन मागे ठेवले. आता सरकारने आपला शब्द पाळून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सरकार १४ लाख १३ हजार टनांचे उद्दीष्ट पूर्ण करणारन नाही, हे जवळपास निश्चित आहे. पण निदान ज्या शेतकऱ्यांनी महीभावाने खेरदीसाठी नोंदणी केली किमान त्या शेतकऱ्यांचे तरी सोयाबीन खेरदी करावे, अशी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.