
Pune News: राज्यात आतापर्यंत जवळपास ७ लाख २८ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. तसेच ज्या जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाले त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दीष्ट देण्यात येणार आहे. मुदतीत खरेदी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती पणन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात खरेदी सुरु झाली तेव्हापासून अडचणी कायम होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या अडीच महिन्यांमध्ये खरेदी रखडच सुरु होती. शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये बारदाणा नसल्याने बहुतांशी केंद्रांवर खरेदी ठप्प होती. यातच १२ जानेवारीची पहिली खरेदीची मुदत संपली. सरकारने नंतर ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. सुरुवातीचे दोन-तीन दिवस तरीही बारदाणा मिळाला नव्हता. मात्र नंतर सरकारने बारदाणा उपलब्ध करून दिला. आता खेरदी वेगाने सुरु आहे.
सोयाबीनमधील कमी झालेला ओलावा आणि चांगली आवक यामुळे राज्यातील सोयाबीनच्या खरेदीने चांगला वेग घेतला होता. बारादाणाही पुरेसा उपलब्ध असल्याने खरेदी चांगली सुरु होती. पण नविन मुदतवाढ देताना सरकारने जिल्ह्यांना नविन खेरदीचे उद्दीष्ट दिले होते. जिल्हानिहाय खरेदीचे उद्दीष्ट दिल्याने आता मात्र शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
कारण काही जिल्ह्यांमध्ये खरेदीला वेग आल्याने उद्दीष्ट पूर्ण झाले. अकोला जिल्ह्यात खेरदीचे उद्दीष्ट गुरुवारी (ता.२३) पूर्ण झाले होते. त्यामुळे खरेदी थांबावावी लागली. आजही जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर शेतकरी गाड्या घेऊन खरेदीची वाट पाहत आहेत. इतरही काही जिल्ह्यांमध्ये खरेदी उद्दीष्टाच्या जवळ पोचल्याचे काही जिल्ह्यातील खरेदी केंद्र चालकांनी सांगितले.
जिल्ह्यांचे खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. उद्दीष्ट संपले म्हणजे खरेदी बंदच होणार, अशी चर्चा सुरु आहे. पण पणन मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले, ज्या जिल्ह्यांचे खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाले त्या जिल्ह्यांना सुधारित वाढीव उद्दीष्ट देण्यात येईल. मात्र खरेदी सुरुच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजेच जिल्ह्याचे खेरदीचे उद्दीष्ट पूर्ण झाले तरी खरेदी थांबणार नाही तर जिल्ह्यांना वाढीव उद्दीष्ट देण्यात येणार आहे.
खरेदी कमीच
पणन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २३ जानेवारीपर्यंत ७ लाख २८ हजार टनांची खरेदी झाली होती. राज्यात एकूण १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट आहे. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ ५२ टक्के खरेदी पूर्ण झाली. तर पहिल्या टप्प्यातील १० लाख टनांच्या उद्दीष्टाच्या तुलनेत जवळपास ७३ टक्के खरेदी झाली. म्हणजेच अजूनही पहिल्या टप्प्यातील उद्दीष्टही साध्या झालेले नाही.
महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदी
सोयाबीन खरेदीत आता महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदी झाली आहे. महाराष्ट्रात ७ लाख २८ हजार टन खरेदी झाली. तर मध्य प्रदेशात ६ लाख २२ हजार टनांची खरेदी झाली. मध्य प्रदेशातील खरेदी २ जानेवारीलाच बंद झाली. आता केवळ महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये खरेदी सुरु आहे. राजस्थानमध्ये खेरदीसाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.