
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून ऊस पट्ट्यात पडलेल्या थंडीचा अनुकूल परिणाम साखर उताऱ्यावर (Sugar Production) होत आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याच्या आकडेवारीनुसार सोलापूरने गाळपात (Sugarcane Crushing) आघाडी घेतली आहे. तर कोल्हापुरात उताऱ्याचा टक्का वाढला आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत सरासरी उतारा कमी असला, तरी डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याअखेर उताऱ्यात काहीशी वाढ झाल्याचे चित्र आहे.
राज्यात १५ जानेवारी अखेर ६३० लाख टन उसाचे गाळप झाले. ९.५७ उताऱ्याने ६०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सोलापूर विभागाने सर्वाधिक १५५ लाख टन उसाचे गाळप करत राज्यात आघाडी घेतली.
मात्र सरासरी उतारा कमी असल्याने साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर विभागाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्के वरून आता ११ टक्के पोहोचला आहे.
राज्यात एकूण १०१ सहकारी व ९७ खासगी कारखाने असे १९८ साखर कारखान्यांनी यंदा गाळपास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा तिला चार कारखाने जास्तीचे सुरू झाले आहेत. यंदा गाळप क्षमतेत वाढ झाली आहे.
या वर्षी या कालावधीत ५९६ लाख टन उसाचे गाळप झाले होते यंदा ते ६३० लाख टनावर पोहोचले आहे.
डिसेंबरनंतर राज्यात विविध ठिकाणी हळूहळू थंडीचे प्रमाण वाढू लागले. ऊस पट्ट्यामध्येही डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये सरासरी चार ते पाच अंशांनी दिवसा व रात्रीचे तापमान कमी झाले.
गेल्या पंधरवड्यात साधारणतः पंधरा ते वीस अंश सेल्सिअस इतके तापमान ऊस पट्ट्यात राहिले.
याचा काहीसा लाभ उतारा वाढण्यावर झाल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. कोल्हापूर विभाग वगळता अजूनही राज्यातील इतर विभागांनी १० टक्क्यांचा साखर उताराही गाठलेला नाही.
पुणे, नगर, नागपूर, नांदेड, अमरावती या विभागाचा साखर उत्पादन ९ ते ९.५७ टक्क्यांपर्यंत आहे. सोलापूर, औरंगाबाद विभाग अजूनही साडेआठ टक्क्यांपर्यंतच साखर उतारा मिळवत आहेत. प्रत्येक विभागात गेल्या पंधरवढ्यात किंचित वाढ नोंदवली गेली.
वेळेत ऊसतोडी देणे अडचणीचे
राज्याचा ऊस हंगाम आता हळूहळू मध्यावरून अंतिम टप्प्याकडे जाणार आहे. ज्या प्रमाणात उसाचा तोड गतीने व्हायला हवी त्या पद्धतीने शिवारातून ती होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या उसाची तोड करण्यासाठी सातत्याने कारखान्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत.
ऊस तोडणी कामगारांची अपुरी संख्या असल्याने उसाची तोड धीमी आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटी शेवटी उसाची तोडणी वेळेत करणे हे आव्हान ठरणार आहे. काही कारखाने तर अजूनही वेळापत्रकाच्या पंधरा दिवस मागे आहेत.
अपुऱ्या यंत्रणेमुळे कारखान्यांपुढे शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोडी देणे अडचणीचे बनत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.