
Kolhapur News : ‘एल निनो’मुळे येणाऱ्या हंगामात उसाचे उत्पादन घटून त्याचा परिणाम साखरेचे उत्पादनावर कमी होण्यावरही होईल, अशी चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर काम करणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने मात्र साखर उत्पादन घटीच्या अंदाजाचे खंडन केले आहे.
साखर उत्पादनात घट होणार या केवळ अफवा असल्याचे महासंघाने म्हटले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एकीकडे कारखानदारांकडून हंगाम केवळ ९० दिवस चालण्याचे दाखले दिले जात असताना महासंघाने हे मत व्यक्त केले आहे. येणाऱ्या हंगामात देशांतर्गत साखर साठ्यात घट होणार नसल्याचा दावा महासंघाने केला आहे.
महासंघाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र वगळता देशातील अन्य राज्यांत पुरेसा पाऊस झाला आहे. येणाऱ्या कालावधीत या राज्यांमध्ये साखर उत्पादन घटीचा प्रश्न उद्भवत नाही. उत्तर प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाना, बिहार, उत्तराखंड इत्यादी राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
ज्याने निश्चितपणे उभ्या उसाच्या वाढीच्या टप्प्यात वजन आणि सुक्रोझ वाढण्यास मदत केली आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत गेल्या वर्षीपेक्षा दहा लाख टन साखर उत्पादन जादा प्रमाणात होईल. कर्नाटकातही साखर उत्पादन घटेल, असा अंदाज होता. पण तेथेही क्षेत्र वाढल्याने साखर उत्पादनात घट होणार नाही.
काही प्रमाणात कच्च्या साखरेची आयात शक्य
हवामानाच्या प्रभावामुळे गाळप करता येण्याजोगा ऊस कमी होण्याची शक्यता असलेल्या भागात ऊस गाळपासाठी भारत काही प्रमाणात कच्च्या साखरेची आयात करू शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये जेथे गाळप क्षमता वाढली आहे तेथे ही बाब महत्त्वाची आहे. गाळपासाठी उसासोबत कच्च्या साखरेचा वापर केल्यास कारखान्यांना आर्थिक स्तरावर चालना मिळेलच पण साखरेचे निव्वळ उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.