
Pune News: कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरु आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने आपली मंजुरी दिल्याचे सांगितले जाते. आयात शुल्क काढल्यानंतर कापसाच्या दरात १० टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातून सूत आणि कापड निर्यात वाढेल, असा दावा उद्योगांनी केला आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना तर बसेलच शिवाय सीसीआयलाही २ हजार कोटींच्या दरम्यान नुकसान सहन करावे लागेल.
चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. देशात यंदा उत्पादन घटले. कापसाचा वापर मात्र कायम आहे. त्यामुळे देशात कापसाची आयातही वाढत आहे. भारत दरवर्षी १० ते १५ लाख गाठी अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात करत असतो. कारण या कापसाचे देशात उत्पादन होत नाही. पण लांब धाग्याच्या कापसाची आयातही वाढत आहे. मात्र या कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क आहे.
कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्क काढण्यासाठी सूत आणि कापड उद्योगाने लाॅबिंग सुरु केले. वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयात शुल्क रद्द करण्याला परवानगी दिल्याची माहीती आहे. आता वाणिज्य मंत्रालयाकडे लाॅबींग सुरु आहे. उद्योगांचे म्हणणे आहे की, देशात कापसाचे भाव जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कमी आहेत. त्यामुळे देशातील महाग कापसापासून निर्माण झालेल्या सूत आणि कापडाचे दरही जास्त राहत आहेत. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त कापूस देशात आला तर देशातून सूत आणि कापड निर्यात वाढेल.
कापूस बाजारभाव
देशात सध्या कापसाचे बाजारभाव स्थिर दिसत आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. तसेच खुल्या बाजारात कापूस खंडीचे दर ५३ हजार ते ५५ हजार रुपये आहेत. भारताने आयात शुल्क काढले तर आयात कापूस ४८ हजार ते ५० हजार रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान पडेल. म्हणजेच देशातील बाजारात कापसाच्या भावात १० टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना हमीभाव द्या
आयात वाढल्याने देशात कापसाचे भाव पडण्याची शक्यता आहे. पण सध्या बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकला. तरीही देशात भाव पडले तर सीसीआय कापसाची हमीभावाने खरेदी करेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणारन नाही. सीसीआय शेतकऱ्यांच्या हीताचे रक्षण करेल, असे सीसीआयने म्हटले आहे.
सीसीआयला फटका बसणार
देशात कापसाचे भाव पडल्यानंतर केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सीसीआयला देखील फटका बसेल. सध्या देशात सीसीआयकडेच सर्वाधिक कापसाचा स्टाॅक आहे. सध्या सीसीआय कापूस खंडीची विक्री ५५ हजार ते ५६ हजार रुपयाने करत आहे. मात्र आयात खुली केल्यास आयात कापूस ४८ हजार ते ५० हजार रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान आयात होईल. देशात कापसाचे भाव कमी होतील. यामुळे सीसीआयला किमान २ हजार कोटींचा फटका बसू शकतो, असे सीसीआयचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.