
देशात उडदाचे दर तेजीत
देशातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन उडदाची आवक सुरु झाली. मात्र पावसामुळं आवक होणाऱ्या मालात ओलावा अधिक आहे. त्यामुळं या उडदाचे दर काहीसे कमी आहेत. मात्र दर्जेदार उडदाचा भाव तेजीत आहे. तसंच आवक होणाऱ्या उडदालाही चांगला दर मिळतोय. आयात उडदाचे दर सध्या ८ हजार ते ८ हजार ३०० रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळं देशातील दरालाही आधार मिळतोय. देशभरात उडदाला ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. तर राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये उडदाला ७ हजार ४०० ते ते ८ हजार रुपये दर मिळतोय. तर आवक वाढल्यानंतरही उडीदाचे दर जास्त दबावात येणार नाहीत, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
काबुली हरभरा भाव खाण्याची शक्यता
देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे दर काहीसे दबावात आहेत. मागील आठवडाभरात काबुली हरभऱ्याचे दर क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयाने नरमले होते. वाढीव दराने काबुली हरभऱ्याला उठाव कमी राहिला, परिणामी दर दबावात आले. भारतात काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी होतं. त्यामुळं आयातही केली जाते. मात्र सध्या जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याचा पुरवठा मर्यादीत आहे. तसंच देशात पुढील काळ सणांचा असल्यानं काबुली हरभऱ्याच्या दरातील घसरण थांबून सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
पांढरा वाटाणा तेजीतच राहणार
देशात सध्या वाटाण्याचे दर तेजीत आहेत. देशातील वाटाण्याचं उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळं आयातीवर अवलंबून राहावं लागतं. मात्र निर्बंधामुळं विदेशातून कमी आयात होतेय. त्यातच सध्या वाटाण्याला मागणी वाढली. त्यामुळे बाजारात मागील तीन आठवड्यांत पांढऱ्या वाटाण्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या देशात पांढऱ्या वाटाण्यााला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळतोय. तर पुढील काळात वाटाण्याला मागणी वाढून दरात आणखी तेजी येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
तुरीचे दर ३०० रुपयाने नरमले
आज तुरीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. वाढलेल्या कमाल दरात तूर खरेदीसाठी मिल्स उत्सुक दिसल्या नाहीत. तर स्टाॅकिस्ट आणि व्यापारी यांनी नफावसुली केली. त्यामुळं तुरीची विक्री अधिक आणि खरेदी कमी, असं चित्र बाजारात पाहायला मिळालं. त्यामुळं सोमवारी तुरीचे दर ३०० रुपयांपर्यंत नरमले. राज्यातही तुरीला ७ हजार ते ७७०० रुपये दर मिळाला. मात्र नवीन हंगामात तुरीची अधिक आयात होण्याची शक्यता कमी आहे. तर देशातील साठाही मागणीच्या तुलनेत पुरेसा नाही. त्यामुळं तूर दरातील घसरण थांबेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
डाळिंबाला दराची लाली चढणार का?
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठा आर्थिक फटका बसतोय. राज्यात सुमारे १ लाख ७० हजार हेक्टरवर डाळिंब पीक आहे. डाळिंबाचा अंबिया बहार जानेवारीपासून धरला जातो. तर या हंगामातील डाळिंबाची काढणी जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून सुरु होते. पाण्याची सोय असलेल्या भागात ३५ हजार हेक्टरवर अंबिया बहार धरला जातो. या काळात पावसानं पिकाला जोखीम असते. मात्र या हंगामातील डाळिंबाला दरही चांगला मिळतो. गणेशोत्सवात डाळिंबाला मोठी मागणी असते. त्यामुळं हा काळ लक्षात घेऊन शेतकरी आंबिया बहाराचं नियोजन करतात.
चालू हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो ११० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र डाळिंबाला पावसाचा फटका बसतोय. बाजारपेठेत डाळिंबाची आवक होतेय. मात्र पावसामुळं अपेक्षित मागणी नाही. परिणामी डाळिंबाला हवा तसा उठाव मिळत नाही. त्यामुळं डाळिंबाच्या दरात किलोमागं २० रुपयांपर्यंत घसरण झाली. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस ९० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मागील वर्षी हाच दर १५० रुपये होता. म्हणजेच सध्या डाळिंबाला ६० रुपयांपर्यंत कमी मिळतोय. त्यातच पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं डाळिंबाचा दर्जा घसरला. त्यामुळं दर्जेदार डाळिंबाचं उत्पादनही कमी झालंय. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रति किलोस ६० ते ७० रुपये असा दर मिळतोय. परिणामी डाळिंब उत्पादकांचं आर्थिक गणित यंदा कोलमडतंय. मात्र तोंडावर असलेल्या गणेशोत्वात डाळिंबाला मागणी वाढून दर सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.