
1. देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली होती. वायद्यांमध्ये कापसाचे भाव ३२० रुपयांनी कमी होऊन ६० हजार ६०० रुपयांवर आले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. उत्तर भारतातील बाजारात नव्या कापसाची आवक होत आहे. पण सध्या आवकेचे प्रमाण कमी आहे. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याची शक्यता असल्याने भाव चांगले राहण्याचा अंदाज असल्याचे जाणकारांनी सांगितले.
2. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. सोयाबीनला सध्या बाजारात ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील सोयाबीनचे व्यवहार काहीसे मंदावले आहेत. यंदा सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटकाही बसत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होईल, असा अंदाज आहे. पण मागील हंगामातील साठा शिल्लक असल्याने सोयाबीन दरात फार मोठी तेजी सध्यातरी दिसत नाही, असे जाणकारांनी सांगितले.
3. उडदाला सध्या चांगला उठाव आहे. मागील हंगामात देशातील उत्पादन कमीच राहीले. तर यंदा लागवड घटली आहे. देशातील कडधान्य लागवडीत उडदाखालील क्षेत्र सर्वाधिक घटले. परिणामी खरिपातील उडदाचे उत्पादन कमीच राहणार आहे. यामुळे उडदाचे भाव टिकून आहेत. सध्या उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजारांचा भाव मिळत आहे. उडदाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. देशात सध्या आल्याचे भाव तेजीतच आहेत. बाजारातली आल्याची आवक कमीच असल्याने दराला चांगला आधार मिळाला. सध्या देशातील बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील आणखी काही दिवस आल्याची बाजारातील आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आल्याचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. सध्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. टोमॅटो विक्रीतून वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात टोमॅटोला केवळ एक रुपया प्रतिकिलोपासून भाव सुरु होतो. तर सरासरी भावपातळी ५ रुपये प्रतिकिलो आहे. हा भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १२ रुपयांपर्यंत आहे. तर विक्रीला बाजारात नेण्यासाठी किलोला दोन ते तीन रुपयांचा खर्च येतोच. आता बाजारात मिळणाऱ्या भावातून केवळ वाहतुक खर्च वसूल होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर उत्पादन खर्चाचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्या टोमॅटोचे भाव पडण्यामागे सरकारचे धोरणही जबाबदार असल्याचे शेतकरी सांगतात. टोमॅटो महाग झाला होता तेव्हा सरकारने नेपाळमधून आयात करून भाव पाडले होते. तर टोमॅटोचे भाव वाढू द्यायचे नाही यासाठी सरकारने सतत प्रयत्न केले. आता टोमॅटोचे भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. पण सरकार या काळात शेतकऱ्यांना आधार देत नाही. तसेच यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे टोमॅटोचा पुढील हंगाम घेता येईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे अर्थाकारण कोलमडण्याची शक्यता आहे. या काळात सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.