
1. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात आज कापूस काहीसा सुधारला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८६.७७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये कापूस ६२० रुपयांनी सुधारून ६१ हजारांवर पोचला होता. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव मात्र स्थिर आहेत. पण नव्य हंगामात कापसाला चांगला भाव राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
2. सोयाबीनच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत १३.६६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे भाव ४६ हजार ते ४८ हजार रुपये प्रतिटनांवर होते. नव्या हंगामात सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. बाजारात सध्या ज्वारीचे भाव तेजीत आहेत. मागील हंगामात देशातील ज्वारीचे उत्पादन घटले होते. तर चालू खरिपात ज्वारीची लागवड कमी दिसते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. तर दुसरीकडे ज्वारीला चांगला उठाव आहे. सध्या ज्वारीला वाणानुसार आणि गुणवत्तेनुसार ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
4. देशातील बाजारात हरभरा दरात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. वाढलेल्या भावात हरभरा उठाव काहीसा कमी झालेला दिसला. तर दुसरीकडे नाफेडची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे हरभरा भावात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. हरभऱ्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. हरभरा भावातील तेजी कायम दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
5. देशातील बाजारात कांदा भावात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा झालेली दिसते. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भावात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची वाढ झाली. सरकारने कांदा निर्यातीवर मागील महिन्यात ४० टक्के शुल्क लावल्यानंतर कांदा बाजारावर मोठा दबाव आला होता. कांद्याचे भाव क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपायांनी नरमले होते. पण मागील दोन आठवड्यांपासून बाजारातील कांदा आवक कमी होतेय. त्यातच खरिपातील कांदा पिकाविषयीची चिंता वाढली आहे. रब्बीसाठी महत्वाच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे खरिपातील उत्पादनाविषयी सकारात्मक चित्र नाही. या राज्यांतील कांदा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील चाळीतील कांद्याचे नुकसान वाढल्याने मालाचे प्रमाण घटले. टिकत नसलेला कांदा शेतकरी बाजारात विकत आहेत. पण बाजारातील आवक मागील दोन आवठवड्यांपासून कमी झाल्याने भावाला काहीसा आधार मिळाला. कांदा भाव सरासरी १०० ते २०० रुपयांनी वाढून १ हजार ७०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले. कांद्याच्या भावात सुधारणा होत असली तरी बाजारातील आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यापुढील काळात कांद्याचे भाव तेजीत राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.