
1. सोयाबीनच्या भावात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १३.६७ डाॅलरवर आले होते. तर सोयापेंड ३९६ सेंट प्रतिटनांवर होते. देशातील प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनच्या खरेदी भावात क्विंटलमागं ५० रुपयांची कपात केली होती. देशात सोयाबीनला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
2. देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. भाव वाढले असल्याने काही वेळा नफावसुलीही होत आहे. त्यामुळे वाढलेल्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारात तुरीची उपलब्धता कमीच आहे. त्यामुळे तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवसात आफ्रिकेतील तूर बाजारात यायला सुरुवात होईल. पण देशातील तूर पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. देशातील बाजारात हरभरा भाव तेजीत आहेत. तूर आणि उडदाचे भाव तेजीत असल्याचा फायदा हरभरा भावालाही मिळत आहे. त्यातच सध्या बाजारातली हरभऱ्याची आवक खपूच कमी आहे. त्यामुळे हरभरा बाजारभाव तेजीत आहेत. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजारांचा भाव मिळत आहे. सणांच्या काळात हरभरा डाळीला आणखी मागणी वाढेल. त्यामुळे हरभरा भाव कायम राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी घट झाली. बाजारातील आवक वाढली पण काही बाजारपेठांमधील मागणी कमी झाली. त्यामुळे टोमॅटोचे भाव दबावातच आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ४०० ते ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील टोमॅटोची मागणी पुढील काही दिवसांमध्ये सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावातही काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. कापूस वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कमी झाले होते. पण कापसाची भावपातळी जास्त कमी झाली नाही. देशातील काही ठिकाणी पूर्वहंगामी लागवडीचा कापूस दाखल झाला. उत्तरेतील पंजाब, हरियाना आणि राजस्थान तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नव्या कापसाचा मुहुर्त झाला. पण हा कापूस केवळ काही किलो होता. कापूस कमी असला तरी नव्या हंगामाची सुरुवात होतेय, याची चाहूल यातून लागली. नव्या कापसाला ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव निघाले होते. नव्या हंगामात दुष्काळ हा एक महत्वाचा फॅक्टर असणार आहे. दुष्काळामुळे देशातील कापूस उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज आहे. दुष्काळी स्थितीचा फटका जवळपास सर्वच कापूस उत्पादक राज्यांना कमी अधिक प्रमाणात बसला. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील जिल्ह्यांसह आणि इतर कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील कापूस पिकाला कमी पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी पिकाची वाढतच झाली नाही. तर पाते, फुले आणि बोंडे गळून पडत आहेत. गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. जगातील इतर देशांमध्येही कापसाचे उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाला नव्या हंगामात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.