
सोयाबीनमध्ये नरमाई
सरकारची हमीभावाने सोयाबीन खरेदी थांबल्यानंतर सोयाबीनच्या भावात काही बाजारांमध्ये नरमाई पाहायला मिळाली. सोयाबीनचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाला होता. हमीभावाने खरेदी सुरु होती तेव्हा खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळत होता.
मात्र आता सरासरी ३ हजार ८०० ते ३ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सनीही आपले खरेदीचे भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनवरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाचे भाव स्थिर
देशात कापसाचे भाव स्थिर आहेत. खुल्या बाजारात सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील कापूस आवक दीड लाख गाठींच्या खाली आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून कापसाची आवक सरासरी १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान आहे. तर सीसीआयची खरेदीही सुरू आहे.
सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीसीआयकडे जात आहे. कारण खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. बाजारातील कापसाची आवक चालू महिन्यात सव्वा लाख गाठींच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे बाजारभावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
लाल मिरची दबावात
देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता. बहुतांशी बाजारात मिरची १८ हजार ते २० हजाराने विकली जात होती.
पण त्यानंतरही मिरचीचे भाव कमी होत गेले. देशातील उत्पादन वाढल्याने दरावर दबाव वाढत गेला सध्या देशातील बहुतांशी बाजारात मिरची १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीचे भाव पडल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरीचा भाव कमीच
बाजारात तूर आवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीच्या भावात मोठी नरमाई आली. देशातील बाजारात तुरीला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. काही ठिकाणी आगाप लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली. पण आवक अगदीच किरकोळ आहे. तर यंदा उत्पादनवाढीचे अंदाज असल्याने भावावर दबाव आहे.
सध्या बाजारात तुरीला ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतरही तूर बाजारात या पातळीच्या दरम्यान राहू शकतो. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गवारचे भाव टिकून
बाजारातील गवारची आवक कमीच आहे. तर गवारला चांगला उठाव आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादीत दिसत आहे. इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे. बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.