सोयाबीनच्या भावात आज आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १३.७५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४५४ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही दबावातच होते. सोयाबीनला आज ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. दिवाळीमुळे बाजारात सोयाबीनची आवक होत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सना गरजेप्रमाणे माल मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव देशात सध्या स्थिर दिसत आहेत, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
देशात कापसाचे भाव एका पातळीवर स्थिर दिसत आहेत. देशात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट आली. पण मागील हंगामातील काही शिल्लक आणि सध्या बाजारात येणारा कापूस यामुळे कापसाच्या भावावर दबाव आहे. कापसाचा भाव आजही ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापूस आवक बघता पुढील एक किंवा दोन महिन्यानंतर बाजारातली आवक कमी होण्याचा अंदाज आहे. त्यातच देशातील कापूस उत्पादन घटल्याने नंतरच्या टप्प्यात कापसाची टंचाई निर्माण होऊन दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
जिऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आली आहे. जिऱ्याचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत वायदे आणि बाजार समित्यांमध्येही कमी झाले. सणांच्या काळातही जिरा नरमल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण नफावसुलीसाठी विक्री वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यातच वाढलेल्या मागणीत जिऱ्याला उठाव मिळत नव्हता. लागेल तेव्हढाच माल व्यापारी खरेदी करत होते. यामुळे भावावर दबाव आला. भाव कमी झाल्यानंतर जिऱ्याला मागणीही वाढली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४१ हजार ते ४३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये जिऱ्याचे व्यवहार ४४ हजार ते ४६ हजार रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जिऱ्याचे भाव पुन्हा सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
उडदाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील उडदाची आवक कमीच आहे. पण उडदाच्या भावात तेजी आल्यानंतर नफावसुलीसाठी उडदाची विक्री वाढली होती. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी असला तरी उडदाचे भाव स्थिरावले होते. त्यातच काही प्रमाणात आयातही सुरु आहे. नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरु झाली. यामुळेही उडदाच्या भावातील तेजी थांबली आहे. सध्या उडदाचे भाव ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील उडीद उत्पादन गरजेपेक्षा कमीच राहिले. तसेच सणांच्या काळात उडदाच्या डाळिला चांगला उठाव राहू शकतो. त्यामुळे उडदाच्या दरातील तेजी कायम राहू शकते. तर रब्बीतील उत्पादनही कमीच राहण्याचा आहे. त्यामुळे तेजीला आधार असल्याचे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक कमीच आहे. पण सरकारी धोरणांचा दबाव कांदा बाजारावर दिसून येत आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे कांदा भावात सुधारणा अपेक्षित होती. पण सरकारच्या धोरणामुळे कांदा भाव वाढले नाहीत, असे शेतकरी सांगत आहेत. कांद्याला आज सरासरी ३ हजार २०० ते ३ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. दुसरीकडे दिवाळीमुळे कांद्याला मागणी वाढली. आवकही कमी आहे. पण सरकार दिवाळीच्या काळात कांदा भाव जास्त वाढू देण्याच्या मानसिकतेत नाही. सरकार भाव कमीच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सध्या कांद्याचा पुरवठा कमी आहे. परिणामी पुढील काळात टंचाई वाढून दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.