Market Intelligence : कापसाच्या भावात चालू आठवड्यात चढ उतार दिसून येत आहेत. बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्येही आज कापसाच्या भावात काहिशी वाढ झाली होती. काल बाजार कमी झाला होता. बाजार समित्यांमध्ये कापसाच्या कमाल भावात कालच्या तुलनेत क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊन भावपातळी ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तर आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये खंडीमागे १०० रुपयांची वाढ झाली होती. कापूस खंडीचे वायदे ५७ हजार २०० रुपयांवर पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही वायद्यांमध्ये काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाचा भाव आणखी काही दिवस या भावपातळीच्या दरम्यान राहू शकतो. मात्र त्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आहे.
देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात मागील चार दिवसांपासून नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आलेल्या नरमाईचा परिणाम आपल्या देशातील बाजारातही दिसून आला. दुसरीकडे बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच असली तरी उद्योगांंना अपेक्षित माल मिळत आहे. त्यातच सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव स्थिरावले आहेत. त्यामुळे सोयाबीनला ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील मृग हंगामातील डाळिंबाची काढणी सुरू झाली. दिवाळीपूर्वी दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये प्रति किलो असा दर मिळत होता. पण सध्या देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली. मात्र अपेक्षित उठाव नसल्याने डाळिंबाच्या दरात प्रति किलोस २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे. देशात यंदाच्या हंगामात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मृग बहर साधला आहे. आतापर्यंत अंदाजे २५ ते ३० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची काढणी झाली. दिवाळीनंतर डाळिंब काढणीला गती आली. याचा परिणाम दरावर झाला. दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १३५ रुपये असा दर मिळत आहेत. डाळिंबाचे हे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. तुरीचे भावही वाढले आहेत. बाजारात तुरीचा पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. देशात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. देशात तुरीचे भाव वाढल्याने निर्यातदार देशही माल मागे ठवत आहेत. आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅक आहे. पण जास्त भावाच्या अपेक्षेने भारताला कमी प्रमाणात तूर पाठवत आहे. परिणामी देशात तुरीचा पुरठा कमीच आहे. त्यातही यंदा तूर लागवड कमी आहे. दुष्काळामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
यंदा गहू बाजाराचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला विक्रमी भाव मिळत आहे. लागवडीच्या काळात चांगला भाव मिळल्यास त्या पिकाची लागवड वाढते. पण यंदा दुष्काळी स्थिती आणि पाणी टंचाईमुळे लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. यामुळे गहू बाजारावरील सरकारचे निर्बंधही कायम राहण्याची शक्यता आहे. बाजारात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ७०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.