
देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण भावपातळी मागील आठवड्यापासून वाढली आहे. सोयाबीनचा भाव आता प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली वाढ आणि देशातील बाजारात सोयाबीनची कमी झालेली आवक यामुळे दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. तसेच देशातून सोयापेंड निर्यातीचे करारही होत आहेत. सोयापेंडला मागणी येत असल्यानेही सोयाबीनच्या भावाला आधार मिळत आहे. दिवाळीनंतर शेतकरी आता सोयाबीनच्या दरवाढीची वाट पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक सरासरीच्या तुलनेत काहीशी मर्यादीत राहण्याचा अंदाज असल्याचे सोयाबीन बाजारातील आभ्यासक आणि व्यापारी सांगत आहेत.
देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक बाजारात कापसाचे व्यवहार सुरु झाले. तसेच पुढील आठवडाभरानंतर बाजारातील आवक वाढून व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारातील कापूस आवक वाढल्यानंतर जिनिंही क्षमतेने सुरु होत आहेत. यामुळे कापसालाही उठाव वाढू शकतो. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव टिकून आहे. देशातच नव्हे तर जागतिक कापूस उत्पादनातही घट झाली आहे. भारताची कापूस आयात वाढणार आहे. म्हणजेच देशात कापसाची टंचाई भासू शकते. यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य ८०० डाॅलर प्रतिटनांपर्यंत वाढवले. परिणामी देशातील बाजारात कांद्याचे भाव कमी झाले होते. किमान निर्यात मुल्यात वाढ केल्यामुळे कांदा भावात जास्त नरमाई अपेक्षित नव्हती. पण व्यापाऱ्यांवरील दबाव आणि सरकारचे धोरण यामुळे कांदा भावात क्विंटलमागं जवळपास एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत नरमाई आली होती. ऐन दिवाळीत चांगल्या भावाची अपेक्षा असतानाही शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागला. पण मागील काही दिवसांपासून कांदा भावात सुधारणा झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. देशात कांद्याची टंचाई कायम आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
मोतीमोल भावात टोमॅटो विकण्याची वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला. कारण बहुतांशी बाजारात टोमॅटोचे भाव वाढले आहेत. खरिपातील लागवडीचा माल येऊन गेल्यानंतर बाजारात पुन्हा मालाचा तुटवडा जाणवत आहे. बाजारातील आवक कमी झाली मात्र मागणी कायम आहे. विशेष म्हणजे टोमॅटोसह भाजीपाला पिकांना कमी पाण्याचा फटका बसत आहे. याचा परिणाम थेट टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे टोमॅटोचे भाव दोन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचले आहेत. यापुढील काळात टोमॅटो आवक वाढण्याची शक्यता कमीच दिसते. कारण राज्यात सिंचनाची व्यवस्था खूपच कमी भागात आहे. तसेच वातावरणात झापाट्याने बदल होत आहे. परिणामी बाजारातील आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. तुरीचे भावही वाढले आहेत. बाजारात तुरीचा पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. देशात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. देशात तुरीचे भाव वाढल्याने निर्यातदार देशही माल मागे ठवत आहेत. आफ्रिकेतील मोझांबिक आणि इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक आहे. पण जास्त भावाच्या अपेक्षेने या देशांमधील निर्यातदार तूर भारताला कमी प्रमाणात पाठवत आहेत. परिणामी देशात तुरीचा पुरठा कमीच आहे. त्यातही यंदा तूर लागवड कमी आहे. दुष्काळामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.