देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसून आली. सोयाबीनला आज सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवकही काहीशी स्थिर होती. सोयापेंड निर्यातीला मागणी येत असल्याने सोयाबीनच्या भावात सुधारणा झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे आज १३.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४५१ डाॅलरवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातील बाजारातही सोयाबीनची भावपातळी वाढलल्याचे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात कापसाचे भावही काही प्रमाणात वाढले होते. कापसाला आज सरासरी ६ हजार ६ हजार ६०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर बाजारातील कापूस आवक काहीशी कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. दिवाळीमुळे शेतकरी बाजारात कमी कापूस आणत आहेत. यामुळे कापसाचे भाव काहीसे सुधारले पण सुधारणा फार मोठी नव्हती. वायद्यांमध्ये आज दुपारर्यंत वायद्यांमध्ये काहिशी वाढ होऊन वायदे ५७ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. एक खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायदे ७७ सेंटच्या जवळ पोचले. यंदा देशातच नाही तर जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ऐन दिवाळीत झेंडूचे भाव दबावात राहील्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. दिवाळीत झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीत मालाचा तोडा व्हावा यादृष्टीने शेतकरी पिकाचे नियोजन करत असतात. झेंडूसह इतरही फुलांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. पण आता दिवाळी सुरु झाली. मात्र झेंडूच्या फुलांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या झेंडूच्या फुलांना घाऊक बाजारात सरासरी २० रुपये ते ३० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. लक्ष्मीपुजनच्या दिवशी झेंडूला मागणी वाढून भाव सुधारू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
केळीचे दर आजही टिकून होते. बाजारात केळीची आवक मर्यादीत आहे. पण भाववाढीला आधार मिळत नाही, असे शेतकरी सांगत आहेत. कमी दर्जाच्या केळीला राज्यात सध्या ७५० ते १३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर दर्जेदार केळीस २१०० ते २५०० रुपये भाव आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही केळीची आवक कमीच आहे. त्यामुळे केळीचे भाव टिकून आहेत. दिवाळीत केळीला काहिशी मागणी वाढते. याचा आधार केळीला मिळू शकतो. राज्यातील केळीला उत्तर भारतात उठाव कायम आहे. तसेच सध्या गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशातही केळीची आवक अल्प आहे. कमी आवकेमुळे केळीला यंदा चांगले दर आहेत.राज्यातही सणासुदीसह इतर फळांची आवक बाजारात कमी असल्याने केळीला उठाव आहे. त्यामुळे भाव सुधारु शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा बाजारात मागील दोन दिवसांपासून काहिशी सुधारणा दिसून आली. दिवाळीत कांद्याच्या भावात चांगली वाढ होईल, असा अंदाज होता. बाजारातील परिस्थिती दरवाढीला पुरक होती. पण सरकारच्या धोरणांमुळे कांद्याच्या भावावर दबाव आला. कांद्याचे भाव सध्या सराकरी ३ हजार ३०० ते ३ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचले. बाजारातील आवक कमी आणि मागणी जास्त असे समिकरण आहे. पण सरकारच्या धोरणांमुळे कांदा बाजारावर दबाव असून भावाला आधार मिळला नाही. पण देशात कांद्याची टंचाई आहे. ही टंचाई पुढील काळात आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.