
अनिल जाधव
Pune Cotton News : खरिपाच्या तोंडावर शेतकरी कापूस विकत आहेत. आवक वाढल्याने चालू हंगाम आणि गेल्यावर्षीच्या आवकेतील तफावत खूपच कमी झाली. गेल्यावर्षी २४ मे पर्यंत २ लाख ६० हजार गाठींची आवक झाली होती.
यंदा याच तारखेपर्यंत २ लाख ५० हजार गाठी कापूस बाजारात (Cotton Market) आला. सध्या आवक (Cotton Arrival ) सरासरीपेक्षा पाच ते सहा पटींनी अधिक आहे. त्यामुळे दरात क्विंटलमागे १५०० रुपयांची नरमाई दिसून येत आहे.
देशातील बाजारात कापसाची आवक वाढत आहे. चालू हंगामात पहिल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात कापसाची आवक कमी होती.
गेल्या हंगामात याच काळात झालेल्या आवकेच्या तुलनेत यंदा आवक जवळपास ३० टक्क्यांनी कमी होती. पण मार्च महिन्यापासून बाजारातील आवक वाढत गेली.
एप्रिल आणि मे महिन्यातील आवक सरासरीच्या तुलनेत खूपच जास्त झाली. त्यामुळे मागील हंगात मे महिन्यापर्यंत झालेली आवक आणि यंदाची आवक यातील तफावत कमी होत गेली.
देशातील बाजारात २४ मेपर्यंत जवळपास २ लाख ५० हजार गाठींची आवक झाली होती. एक कापूस गाठ १७० किलोची असते. तर मागील हंगामात २४ मे पर्यंत २ लाख ६० हजार गोठी आवक होती.
म्हणजेच गेला हंगाम आणि चालू हंगमातील आवकेतील तफावत केवळ १० लाख गाठींवर आली. म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त राहिली.
याचा दबाव बाजारावर येत गेला. मागील दोन महिन्यांत कापसाचे भाव जवळपास १ हजार ५०० रुपयांनी नरमले आहेत.
मे महिन्यातील आवकेचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ५ ते ६ पटींनी जास्त आहे. मागील वर्षी २४ मे रोजी १६ हजार ५०० गाठींची आवक झाली होती. पण बुधवारी (ता. २४) १ लाख ४ हजार गाठींची आवक झाली होती.
सरासरीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने बाजारावर दबाव येत असल्याचे जाणकारांनी सांगितले. शेतकरी खरिपासाठी कापसाची विक्री करत आहेत.
पावळ्यात जे शेतकरी कापूस ठेवू शकत नाहीत ते मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत. याचा फायदा उद्योगांकडून घेतला जात आहे.
महाराष्ट्रात ३५ ते ३८ हजार गाठींची आवक
सध्या गुजरातमधील बाजारात जास्त आवक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात आवक झाली. गुजरातमध्ये दिवसाला सरासरी ३५ ते ४० हजार गाठींची आवक सुरू आहे. तर महाराष्ट्रात ३५ ते ३८ हजार गाठींची आवक होत आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत म्हणजेच मध्य भारतात दिवसाला ८० ते ८५ हजार गाठींची आवक होत आहे. दक्षिणेत १५ हजार तर उत्तर भारतात ५ हजार गाठींच्या दरम्यान आवक सुरू आहे.
दहावरील दबाव कायम राहण्याची शक्यता
आवकेचा दबाव आणि शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन कापसाला सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव दिला जात आहे. खरिपाच्या लागवडीसाठी आणि पावसाच्या आधी अनेक शेतकरी कापूस विकतील असा अंदाज आहे.
त्यामुळे पुढील काही दिवस कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त राहून दरावरील दबाव कायम राहू शकतो. पण एकदा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.