Akola News : रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पिकवलेली ज्वारी बाजारात सध्या हमीभावापेक्षा सुमारे हजार ते १२०० रुपयांनी कमी विकत आहे. त्यामुळे तातडीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. शासन स्तरावरून या खरेदी प्रक्रियेबाबत अद्याप कुठलेही आदेश नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात बाजार समित्यांमध्ये ज्वारी विकावी लागत आहे.
शासनाने या वर्षात ज्वारीला ३१८० आणि मालदांडी ज्वारीला ३२२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर केला आहे. ज्वारीला एवढा दर कुठल्याच बाजार समित्यांमध्ये सध्या मिळत नाही. बाजार समित्यांमध्ये ज्वारी किमान १८०० व कमाल २३०० रुपयांदरम्यान विकते आहे. सरासरी २१०० रुपये क्विंटल भाव आहे.
खरिपात पावसामुळे नुकसान होत असल्याने आणि बाजारपेठेत ग्राहकांची मागणी पुन्हा वाढल्याने शेतकरी रब्बी तसेच उन्हाळी हंगामात ज्वारीच्या लागवडीकडे वळाला आहे. या पिकामुळे जनावरांच्या चाऱ्याचीही सोय होत आहे. ज्वारीची उत्पादकतासुद्धा एकरी १५ क्विंटलपर्यंत अनेकांना मिळत आहे.
शेतकरी मेहनतीतून ज्वारी पिकवण्याकडे वळाला असतानाच बाजारपेठेतील दर मात्र मारक ठरत आहेत. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने मशागत व इतर कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे सध्या बाजारात ज्वारीची आवक सर्वत्र होत आहे. असे असताना प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्याचे एक हजार ते १२०० रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच ज्वारीची हमीभावाने खरेदी करण्याबाबत मागणी होत आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषद घेत शासनाकडे ही मागणी रेटून धरली आहे. काही बाजार समित्यांनीही हमीभाव केंद्रे सुरू करण्याबाबत शासकीय यंत्रणांकडे पत्रे दिली. तरीही अद्याप या महत्त्वाच्या विषयावर शासनस्तरावरून कुठलाही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.