Mango MSP : आंब्याला हमीभाव द्या
रत्नागिरी : हापूस आंबा उत्पादक (Mango Farmer) विक्रेते सहकारी संस्था आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीने प्रजासत्ताकदिनी रत्नागिरीत धरणे आंदोलन केले. आंबा बागायतदारांची कर्जे (Crop Loan) सरसकट माफ करावीत आणि आंब्याला हमीभाव (MSP For Mango) द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. २०१५ पासून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ३२६, तर थकीत रक्कम २२३ कोटी ८६ लाख रुपये आहे. या शेतकऱ्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा, नियमित असणाऱ्या कर्जदारांना पुन्हा व्यवसायात उभे राहण्यासाठी मिनी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करावी, पीकविम्याचा कोकणातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, त्यासाठी तलाठी सजाला एक डोंगराळ आणि दुसरे सपाटी भागास अशी दोन मोजणी यंत्रे बसवावीत, विम्याचे निकष बदलावेत, निकष ठरवताना शेतकऱ्यांच्या संस्थेचा प्रतिनिधी घ्यावा, अवकाळी पावसाचा कालावधी १ नोव्हेंबर ते ७ जूनपर्यंत असावा, खते, औषधे, पेट्रोल आणि रॉकेलच्या भरमसाट वाढलेल्या किमती तत्काळ कमी कराव्यात, शेतकऱ्याने खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
याशिवाय थकीत शेतकऱ्यांवर जप्तीची सुरू असलेली कारवाई कर्जमाफी मिळेपर्यंत तत्काळ थांबवावी, शून्य वीजचोरी असलेल्या कोकणात पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य कृषी वीजबिले द्यावीत, भरमसाट बिले पाठवणे बंद करावे, आंबा हे पीक नाशीवंत असल्याने या पिकाला हमीभाव मिळावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.