
आंबा पालवी, मोहर, फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा (Mango jassids) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी मोहर, कोवळ्या फळातील रस शोषून घेतल्यामुळे मोहराची गळ होते. हे टाळण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजना पाहुयात.
- आंबा पीक (Mango Crop) सध्या पालवी ते फळधारणेच्या अवस्थेत आहे. किमान तापमानात घट होत असल्याने बोंगे फुटण्याच्या अवस्थेतील झाडावर मोहर फुटण्यासाठी, पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पालवीवर फवारणी करावी.
पालवी, मोहर किंवा फळधारणेच्या अवस्थेतील आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी मोहर, कोवळ्या फळातील रस शोषून घेतल्यामुळे मोहराची गळ होते. तसेच ते मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते.
आर्थिक नुकसान पातळी - किमान ५ तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहर किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर नियंत्रणासाठी प्रती लिटर पाण्यात मिसळून पुढील कीडनाशकांची फवारणी करावी.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि
मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत, इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मिलि
वाटाणा अवस्थेत, थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम
मोहर अवस्थेत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मिलि किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)
मोहर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत कीटकनाशकांची फवारणी टाळावी. फवारणी अत्यंत आवश्यक असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
त्यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी ९ ते १२) वगळून फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
या अगोदर फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडांचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास उपाययोजना कराव्यात.
किमान तापमानात होणारी घट यामुळे आंबा झाडाच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहर येण्याची शक्यता असते.
त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहराकडे होऊन जुन्या मोहराला आलेली वाटाणा ते गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते.
यासाठी मोहर अवस्थेतील आंबा झाडावर पुर्नमोहर प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड (५० पीपीएम) या संजीवकाची १ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
झाडाला पुरेसा मोहर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहर पूर्ण उमललेला असताना आणि नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर फवारणी करावी.
जिबरेलिक ॲसिडची भुकटी अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी.
बागेत आंबा उत्पादन वाढीसाठी आणि प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तीन फवारण्या कराव्यात.
वाटाणा ते सुपारी आकारांची फळधारणा झालेल्या बागेतील फळांची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.