
नागपूर ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे गुण रुजविण्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प (SMART Cotton Project) महत्त्वाकांक्षी ठरला आहे. प्रकल्पाद्वारे राज्यभरात तब्बल १३ हजार ७१ गाठी (Cotton Bales) तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५५४ गाठी तयार करीत चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. २८४ गाठींच्या माध्यमातून अकोला जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.
‘स्मार्ट कॉटन’मधून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे (Cotton Value Addition) गुण रुजले जाऊन हा प्रकल्प देशात गेम चेंजर ठरेल, अशी अपेक्षा या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आहे.
महाराष्ट्राचा विचार करता या ठिकाणी सुमारे ४५ लाख हेक्टरवर कापूस लागवड क्षेत्र आहे. परंतु हे क्षेत्र कोरडवाहू असल्याने त्यातून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही.
कच्च्या कापूस दरात घसरण झाल्यास ही परिस्थिती आणखीच भयावह होते. त्याची दखल घेत कापसाच्या मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात स्मार्ट कॉटन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. देशात अशाप्रकारचा हा एकमेव प्रकल्प ठरला आहे.
या प्रकल्पात शेतकऱ्यांनी ‘एक गाव, एक वाण’चा प्रयोग केला. अशा एकाच वाणाच्या कापसावर प्रक्रिया करून त्यापासून गाठी तयार करण्यासाठी शेतकरी सरसावले. रुई उताऱ्यानुसार त्यांना दर मिळत असून, सोबतच सरकीचे २५ टक्के पैसेही मिळतात.
त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होत आहे. ‘महाकॉट ब्रॅण्ड’ने या कापूस गाठींची विक्री केली जाईल. या मॉडेलची आंध्र प्रदेशलाही भुरळ पडली आहे. तेथील प्रधान सचिव के. सुनीता यांनी नागपूरचा दौरा करीत या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाशी संबंधित बारकाव्यांची नुकतीच माहिती घेतली.
तीन वर्षांसाठी हा प्रकल्प आहे. मूल्यवर्धनातून सरकीचे २५ टक्के पैसे मिळतात. सोबत गाठींचे पैसे वेगळे. वरोऱ्याला सरकीचा बाजार दर ४ हजार रुपये क्विंटल असताना दर्जामुळे ४१७० रुपये शेतकऱ्याला मिळाले. रुई २०० रुपये किलो, सरकी ४० रुपये किलो आहे. त्यामुळे सर्वसाधारणपेक्षा एक टक्का रुईउतारा वाढला. १२५ रुपये क्विंटलमागे फायदा होतो. आतापर्यंत ८ हजार २३२.०८ क्विंटल कापूस प्रक्रियेकामी संकलित होऊन १३ हजार ७१ गाठी तयार झाल्या आहेत.
- जयेश महाजन, नोडल अधिकारी, स्मार्ट कॉटन महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकरी उत्साही आहेत. कृषी विभागाचे अधिकारी तसेच ‘महाकॉट’चे जयेश महाजन यांचे देखील सहकार्य आहे. सामूहिक प्रयत्नातून सर्वाधिक कापूस गाठी तयार करण्याचा पल्ला गाठला.
- नंदकुमार घोडमारे, नोडल अधिकारी, स्मार्ट कॉटन, चंद्रपूर
तालुकानिहाय तयार गाठी
वरोरा (चंद्रपूर) ः ३००
अकोट (अकोला) ः २८४
देवळी (वर्धा) ः २१८
भद्रावती (चंद्रपूर) ः १५२
गोंडपिंपरी (चंद्रपूर) : १०२
दर्यापूर (अमरावती) ः ११०
वरुड (अमरावती) ः १०५
पाथरी (परभणी) ः १०२
देऊळगावराजा (बुलडाणा) ः १००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.