
Pune News : नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करु नये. तसेच सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे. सोयाबीन खरेदीला मुतदवाढ न दिल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने सरकारला देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन स्वतंत्र भारत पक्षाने लातूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात दर मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. केंद्र सरकारने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी चालू केली. त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सोयाबीन खरेदीची अंतिम तारीख ३१ जानेवरी असून अद्याप मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झालेली नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करु नये. तसेच खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यावर्षी केंद्र सरकारच्या डीओसी व पामतेल आयातीमुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षाही कमी झाले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी चालू केली आहे.
त्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. परंतू अद्यापही नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत खरेदी बंद झाली तर शेतकऱ्यांना बाजार समितीतच चालू भावात सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ८०० रुपये प्रति क्विंटल नुकसान होणार आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१३-१३ साली विरोधीपक्ष नेते असताना पाशा पटेल यांच्या शेतकरी दिंडी येऊन सोयाबीनला ६०००/- रु प्रति क्विंटल भाव मागीतला होता.आता ते स्वतः भाव देणारे आहेत. तरीही शेतकऱ्यांना सहा हजार भाव मिळत नाही. शेजारील मध्यप्रदेश राज्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा एक हजार रुपये वाढवून दिले आहेत.
महाराष्ट्रात वाढवून तर नाहीच,पण जाहीर केलेला हमीभावही मिळण्याची शक्यता नाही. कारण नाफेडच्या खरेदीला ३१ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी करत आहेत. परंतु खरेदी केंद्रावर बारदाणा नाही, वजन काटा नाही, अशी कारणे सांगून खरेदी बंद ठेवली जात आहे.तर काही ठिकाणी अधीकची हमाली व कडता घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
त्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना यांच्यावतीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी व खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट बंद करावी. यासाठी २९ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता तिवटग्याळ पाटी, उदगीर येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कल्याणाप्पा हुरदळे, शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, उदगीर तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील आदिंच्या सह्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.