
जळगाव ः खानदेशातून यंदाच्या हंगामात सुमारे ८०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची परदेशात निर्यात (Banana Export) झाली आहे. विविध निर्यातदार कंपन्यांच्या (Banana Exporter Company) मदतीने आखाती देशांत ही निर्यात झाली आहे. (Banana Export To Gulf Country)
यंदा केळी निर्यातीला रेफर कंटेनरचा मोठा तुटवडा जाणवला. रशिया-युक्रेन युद्ध आणि कोविडनंतर चीनममध्ये अडकलेले कंटेनर यामुळे हा तुटवडा अधिक राहीला. त्यात कंटेनरचे भाडे दुप्पट झाले. जळगाव येथून जेएनपीटी येथे केळी वाहतुकीसंबंधी कंटेनरचे (२० टन क्षमता) भाडे मागील वर्षी ६० हजार रुपये होते. ते यंदा ७५ ते ८० हजार रुपये झाले. तसेच जेएनपीटी (मुंबई) ते बंदर अब्बास (दुबई) येथे मालवाहू जहाजातून केळी वाहतुकीसंबंधी कंटेनरचे भाडे मागील वर्षी एक लाख १० हजार रुपये होते. यंदा ते दोन लाख ८० हजार रुपयांवर आकारण्यात आले. कंटेनर हवे तेवढे उपलब्ध होत नव्हते. यामुळे केळी निर्यातदार कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
जळगाव जिल्ह्यातून ३०० कंटेनर आणि नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे ४०० कंटेनर केळीची आखातात व इतर देशांत निर्यात यंदा झाली. तसेच धुळ्यातून सुमारे १०० कंटेनरची पाठवणूक परदेशात झाली आहे. ही निर्यात एप्रिलअखेर सुरू झाली. ती जूनच्या अखेपर्यंत बऱ्यापैकी सुरू होती. सध्या आखातातील किंवा परदेशातील केळी निर्यात अपवाद वगळता खानदेशातून सुरू नसल्याची स्थिती आहे.
केळीची जेवढी मागणी परदेशात होती, तेवढा पुरवठा होत नव्हता. परदेशातील निर्यात सध्या अपवाद वगळता बंद झाली आहे. इराणमध्ये अधिकची मागणी होती. २०२० मध्ये खानदेशातून सुमारे ७०० कंटेनर केळीची निर्यात परदेशात झाली. २०२१ मध्ये १६०० कंटेनरची निर्यात झाली. यंदा त्यात कंटेनर भाडे दरवाढ आणि तुटवडा यामुळे घट आली आहे. यंदाही इराणसह इराक, मस्कत, बहारीन आदी भागांत निर्यात झाली. तर काही कंपन्यांनी युरोपातही निर्यात केली. दहा कंपन्या केळी निर्यातीसाठी काम करीत होत्या. स्थानिक एजंटची मदत त्यासाठी कंपन्यांनी घेतली.
केळी आवक कमी; दर टिकून राहिले
मागील तीन वर्षे केळी पिकात कुकुंभर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) सतत आला. १५ ते ३० जुलै या कालावधीत लागवडीच्या केळी बागांत हा रोग अधिक दिसून आला होता. त्यात २०१९ व २० मध्ये मोठे नुकसान रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा आदी भागांत झाले. परिणामी, २०२१ मध्ये १५ मे ते ३० जुलै या कालावधीत केळीची लागवड घटली. फक्त १५ टक्के लागवड या काळात झाली. यामुळे गेल्या एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत केळीची आवक कमी होती. शिवाय आंबाही यंदा बाजारात कमी होता. त्याचे दरही अधिक होते. यामुळे या काळात केळीचे दर २२००, २५००, २८००, ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. जुलैच्या सुरुवातीलाही दर टिकून होते. मे ते जुलैचा पहिला आठवडा यादरम्यान केळीला सरासरी प्रतिक्विंटल २००० रुपये दर खानदेशात मिळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.