
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः यंदाच्या मॉन्सूनमध्ये (Monsoon) पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात (Kharif Crop Production) किरकोळ घट झाली आहे. मात्र, वैयक्तीक पातळीवर अत्यंत अनियमित मॉन्सूनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना (Monsoon Hit Farmers) बसला आहे. अनेकांना अद्याप राज्य सरकारांकडून मदत मिळालेली नाही.
पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची किंवा महागाई वाढण्याची शक्यता नाही कारण भारताकडे पुरेसा साठा आहे, असे कृषी आणि अन्न धोरण तज्ज्ञांनी सांगितले.
तांदूळ उत्पादन ६ टक्के घसरणार
केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी (ता. २१) जाहीर केलेल्या प्रगत अंदाजानुसार, खरीप तांदळाचे उत्पादन सहा टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. मुख्य तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसामुळे उत्पादन गेल्या वर्षीच्या १११ दशलक्ष टनांवरून यावर्षी १०४.९९ दशलक्ष टनांपर्यंत घरसले आहे.
मुख्य उन्हाळ भाताखालचे एकरी क्षेत्र गतवर्षी ४१.७ दशलक्ष हेक्टरवरून यंदा ३९.९ दशलक्ष हेक्टरवर घसरले आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. दक्षिण आणि मध्य भारतात मॉन्सूनचा अतिरिक्त पाऊस पडला, तर पूर्व आणि ईशान्य भारतात पर्जन्यमानाची कमतरता नोंदवली आहे, असे स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष (हवामानशास्त्र आणि हवामान बदल) महेश पलावत यांनी सांगितले.
खरीप तांदूळ उत्पादनातील अंदाजे घट ही इंडो-गंगेच्या मैदानात (आयडीपी), विशेषत: पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत कमी पावसामुळे झाली आहे. त्याचवेळी मध्य भारतात या काळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतील शेतकरी सप्टेंबरमध्ये उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद आणि मका पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार करत आहेत. पावसामुळे या भागात कापणीला विलंब झाला. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोहरीच्या पेरणीसाठी मदत होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विनय सेहगल म्हणाले की, हंगामाच्या उत्तरार्धात मॉन्सून पुनरुज्जीवित झाल्यामुळे एकूण परिस्थिती ‘भयानक झाली नाही. मॉन्सून उशिरापर्यंत राहिल्याने इंडो-गंगेच्या मैदानात सुधारणा होण्यास आणखी मदत होईल आणि तांदूळ उत्पादनातील तूट चार टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्राने किमतीत वाढ, देशांतर्गत गरजांसाठी कमी पुरवठा आणि निर्यातीत असामान्य वाढ लक्षात घेऊन तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि एक दिवस आधी, उकडा तांदूळ वगळता सर्व बिगर बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू केले होते.
शेतकऱ्यांची नाही, महागाईची चिंता
भारतात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे आणि तांदळाचे उत्पादन सहा टक्क्यांनी कमी झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. दुःखाची बाब म्हणजे प्रत्येकाला शेतकऱ्यांची नाही तर महागाईची चिंता आहे. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला म्हणजे सुमारे ३० कोटी शेतकरी बाधित झाले आहेत. परंतु त्यांच्याबद्दल कोणीही बोलत नाही. सरकारने प्रोत्साहन पॅकेज जाहीर करावे. जर कॉर्पोरेट सेक्टरसाठी ते केले जाऊ शकते तर हे शेतकऱ्यांसाठीदेखील केले जाऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.