
Amravati News : तेलबियांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यातील अडचणींवर उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे करडई, सूर्यफुलाचे लागवड क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात (अमरावती विभाग) करडई व सूर्यफुलाच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम आहे. तसेच रब्बी गळीत धान्याची लागवड केवळ ७२ टक्के क्षेत्रात झाली आहे. तीळ आणि जवस पिकांचे क्षेत्र मात्र वाढले आहे.
अमरावती विभागात रब्बीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ७ लाख ४६ हजार ३९६ हेक्टर आहे. आतापर्यंत ८ लाख ५४ हजार २१२ हेक्टरमध्ये म्हणजे ११४ टक्के क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड झाली आहे. शेतकरी तेलबियांच्या ऐवजी गहू, हरभरा, मका पिकांना प्राधान्य देत आहेत. गव्हाची २.०४ लाख हेक्टरवर, हरभऱ्याची ६.०७ लाख हेक्टरवर, तर मक्याची २० हजार ३०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
अमरावती विभागात करडई पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ८३४ हेक्टर असून आतापर्यंत ६०७ हेक्टर म्हणजे ७३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ६२ हेक्टर असून, आतापर्यंत केवळ पाच हेक्टरमध्ये (आठ टक्के) सूर्यफूल लागवड झाली आहे. तीळ आणि जवसाचे क्षेत्र मात्र सरासरीच्या तुलनेत कमालीचे वाढले आहे.
तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र ७० हेक्टर असताना २१३ हेक्टर म्हणजे ३०२ टक्के क्षेत्रात तीळ पिकाची लागवड करण्यात आली आहे. जवस पिकाचे सरासरी क्षेत्र केवळ एक हेक्टरपर्यंत खाली आले होते. यंदा आतापर्यंत १६६ हेक्टरवर जवस पिकाची लागवड झाली आहे. हा उच्चांक आहे.
इतर रब्बी गळीत धान्याचे क्षेत्र १ हजार ३२९ हेक्टर असून ६६३ म्हणजे ५० टक्के क्षेत्रात इतर तेलबिया पिकांची लागवड झाली आहे. रब्बी हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वेगाने घट होत आहे. कमी उत्पादकता, मजूरटंचाई आणि उत्पादन खर्चात वाढ, ही यामागची कारणे आहेत.
देशातील एकूण गरजेच्या सुमारे ६० ते ६५ टक्के खाद्यतेल आयात केले जाते.
त्यामुळे केंद्र सरकार तेलबिया मिशन राबवून तेलबिया पिकांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा करीत आहे. यंदा पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बीत तेलबिया लागवडीला शेतकरी पसंती देतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
इतर तेलबिया दुर्लक्षित
केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे तेलबिया उत्पादकांना आर्थिक झळ बसत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी रब्बी तेलबिया पिकांकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांचा कल खरीप हंगामातील सोयाबीन लागवडीकडे अधिक आहे. इतर तेलबिया या दुर्लक्षित झाल्या आहेत, पण यंदा तीळ आणि जवस पिकांच्या क्षेत्रात झालेली वाढ ही आशादायक मानली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.