
नागपूर ः कापसाच्या बाजारात (Cotton Market) मोठी उलथापालथ सुरू आहे. अपेक्षीत दर (Cotton Rate) मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली आहे. तर दुसरीकडे कापड उद्योगाला (Textile Industry) कमी दरात कापूस हवा आहे. या साऱ्या घडामोडीत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस उत्पादक (Cotton Farmer) शेतकरीच यंदाच्या हंगामातील गेम चेंजर असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.
जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतीय बाजारातच कापसाचे दर तेजीत असल्याचा दावा कॉटन असोसिएशनकडून केला जात आहे. सध्या कापसाला ८४०० रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना गेल्या हंगामाप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये दर मिळेल,अशी अपेक्षा आहे.
त्याच अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली आहे. परिणामी देशांतर्गंत बाजारात केवळ १ ते १ लाख १० हजार गाठी इतकी अत्यल्प आवक होत असल्याचे सीएआयचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात देखील प्रक्रिया कामी अवघा २५ टक्के कापूस जिनिंग व्यावसायिकांकडे पोहोचला आहे. तब्बल ७५ टक्के कापसाचे होल्डिंग शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात केले आहे, अशी माहिती पणन महासंघाचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर गोस्वामी यांनी दिली.
महाराष्ट्रात ८० लाख गाठी (४०० लाख क्विंटल कापूस) उत्पादकता होते. आतापर्यंत तीस लाख गाठी (दीडशे लाख क्विंटल कापूस) तयार झाल्या आहेत.
त्याचा सर्वाधीक फटका कापड उद्योगाला बसला आहे. कापड उद्योगाला आपले मार्जीन वाढावे याकरिता कमी दरात कापूस हवा आहे.
जागतिकस्तरावर भारतीय कापसाचे दर अधिक असले तरी निर्यात केल्यास ११ टक्के आयात शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.
त्यामुळे सध्यातरी भारतीय कापूस उत्पादकांकडून खरेदीची मानसिकता वस्त्रोद्योगाची आहे, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी दिली.
सीएआयने (कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने) सुरुवातीला ३४४ लाख त्यानंतर ३३९ व आता ३३० लाख गाठींची उत्पादकता होईल, असा अंदाज वर्तविला आहे. पंजाब, हरियाना भागात कापसाची स्थिती खराब असून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढला.
आंध्रप्रदेश, कर्नाटक या दोन राज्यात ही गुलाबी बोंडअळीसोबतच पावसामुळे उत्पादकता प्रभावित होईल, अशी भीती आहे. या साऱ्यांच्या परिणामी कापूस उत्पादकांना यापुढील काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रुईच्या दरात घसरण झाली असली तरी देशांतर्गत शेतकऱ्यांनी कापूस होल्ड करून ठेवला आहे. त्याच्या परिणामी कापसाचे दर यापुढील काळात वाढतील यात शंका नाही. शेतकऱ्यांनी पैशाची गरज असल्यास टप्याटप्याने कापसाच्या विक्रीचे धोरण ठेवावे.
- गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक, नागपूर
मी गेल्या अनेक वर्षांपासून करार शेतीअंतर्गत कापसाची लागवड करतो. यंदा ३५० एकरांवर कापसाची लागवड होती. १७०० क्विंटल पर्यंत कापूस निघाला सुमारे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची उत्पादकता अपेक्षीत आहे. हा सर्व कापूस स्टॉक करून हंगामा अखेर विक्रीवर भर राहतो. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात कापसाच्या विक्रीवर भर राहतो. बाजाराचा अंदाज घेत कापसाची विक्री होते.
- विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख, कापूस उत्पादक, शिराळा, अमरावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.