
कृषी उत्पादनांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणांचा गोरखधंदा लक्षात घेता केंद्र सरकार सेंद्रिय शेती (Organic Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांना तसे सेंद्रिय आधार (Organic Aadhaar) क्रमांक देणार आहे.
कृषी माल निर्यातीला चालना देणाऱ्या अपेडाचे (APEDA) अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
भारतीय सेंद्रिय उत्पादने त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखली जावीत अन जागतिक बाजारातील त्यांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवत असल्याचे सांगताना अंगमुथू यांनी, सेंद्रिय उत्पादनाच्या (Organic Products) प्रमाणीकरणातील बोगसगिरी टाळण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP) अंतगर्त सेंद्रिय शेती (Organic Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय आधार कार्ड देण्यात येणार आहे. तसेच या उत्पादनांच्या गुणवत्तेचे निकष युरोपियन युनियन, स्वित्झर्लंडमधील निकषांसारखे ठेवण्यात येणार आहेत.
युरोपियन देशांची मान्यता असलेल्या भारतातील यंत्रणांकडेच प्रमाणीकरणाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे अंगमुथू म्हणाले आहेत. यासंदर्भात दक्षिण कोरिया, तैवान,कॅनडा,जपान आदी देशांसोबत बोलणी सुरु आहेत.
याशिवाय सरकारकडून देशातील प्रत्येक शेतजमिनीला १४ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे. गेल्या वर्षी १० राज्यांत युनिक लँड पार्सल आयडेंटीफीकेशन नंबर (ULPIN) योजना राबवण्यात येत आहे. लवकरच अन्य राज्यातही तिची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे अंगमुथू म्हणाले आहेत.
सेंद्रिय प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी संबंधित शेतकऱ्याची ओळख त्याच्या व्यक्तिगत आधार आणि युएलपीआयएनवरून पटवण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांच्या ऑरगॅनिक आधारवरील (Organic Aadhaar) माहिती हा सेंद्रिय शेतीचा खात्रीदायक स्रोत असणार आहे. ट्रेसनेट व्यवस्थेशी जोडल्या गेलेले ऑरगॅनिक आधार देशातील सेंद्रिय शेतीच्या चळवळीला गती देईल, असे अंगमुथू म्हणाले आहेत.
२००९ पासून देशात राबवण्यात येणाऱ्या ट्रेसनेट व्यवस्थेचाही (Tracenet system) उपयोग करून घेण्यात येणार असल्याचे अंगमुथू म्हणाले आहेत. या व्यवस्थेच्या माध्यमातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या उत्पादनावर संबंधित शेतकरी, त्याची शेतजमीन, शेतजमिनीत घेतलेल्या उत्पादनासाठी वापरण्यात आलेले घटक आदींची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
दरम्यान ३१ मार्च २०२१ पर्यंत देशभरात ४३३९ लाख हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेती केली जाते. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भारताने ३४.९६ लाख टन प्रमाणित सेंद्रिय उत्पादने घेतली आहेत. यात तेलबिया, ऊस, भरडधान्य, कापूस, चहा, कॉफी, फळभाज्यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.