Harvesting Tips: या वर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाळा अधिक झाला आणि तो उशिरापर्यंतही चालला. परिणामी थंडी थोडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याचा मोहोरसुद्धा दहा-पंधरा दिवस उशिरा सुरू झाला. वास्तविक पाहता मोहोर सुरू झाल्यानंतर थंडीमध्ये चढउतार झाला तरच सेटिंग चांगली होते. मात्र थंडी बहुतांश काळ एकसारखी राहिल्याने अतिशय कमी सेटिंग झाली. कोकण विभागाच्या तुलनेमध्ये मराठवाडा व अन्य भागातील आंबा बागांमध्ये सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे. .बागेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत फळे धरलेली असताना पुन्हा मार्च - एप्रिल महिन्यांमध्ये वादळ, गारपीट आणि पाऊस यांचा फटका बसला. मुळातच झाडांवर कमी असलेल्या फळांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. सध्या अनेक केसर आंबा बागांमध्ये आंबा काढणीला सुरुवात झालेली आहे. नव्या बागायतदारांकडून आंबा काढणीस तयार झाल्याचे कसे ओळखावे, अशी विचारणा सातत्याने होत असते. आंबा झाडावर मोहर एकदाच न येता दोन-तीन टप्प्यात विभागून येतो. त्यामुळे झाडावरील फळेही त्यानुसार वेगवेगळ्या वेळी पक्व होतात. पक्व झालेली फळेच काढणीनंतर चांगली पिकतात. कोवळी फळे काढली गेल्यास ती अजिबात पिकत नाहीत. त्यामुळे आंबा पक्वतेची लक्षणे जाणून घेऊ..Mango Harvesting: आंबा फळांची काढणी करताना....फळाचा देठ खाली येऊन देठाजवळ खड्डा पडणे : फळाच्या देठाकडील भागातील फळाच्या बाजूचे खांदे वर येतात. म्हणजे देठाजवळ खड्डा पडल्यासारखे दिसते. असे आंबे काढायला तयार झाले असे समजावे. मात्र ज्या फळांमध्ये सर्वसाधारणतः फळाचा देठ वर राहून खांदे उताराच्या आकाराचे दिसत असतील अशी फळे अजूनही कोवळी असल्याचे समजावे..फळावरील पांढरे ठिपके ः आंबा फळावर असंख्य असे पांढरे ठिपके असतात. हे ठिपके कोवळ्या फळात लहान असून, ठळकपणे दिसत नाहीत. मात्र, फळ पक्व होताच पांढरे ठिपके मोठे होऊन ठळकपणे दिसू लागतात. असे फळ पक्व झाल्याचे समजावे..फळाचा आकार ः फळे पक्व झालेली असताना फळाचा आकार थोडा गोलसर व भरीव दिसतो, हे अनुभवी मजूर सहज ओळखू शकतो. फळामध्ये हा भरीवपणा नसल्यास किंवा चोच बोथट झालेली नसल्यास फळ अजूनही कोवळेच असल्याचे समजावे.फळांचा नरमपणा ः फळे बोटाने थोडी दाबली असता थोडा नरमपणा जाणवतो. अनुभवी माणसांना यावरून पक्वता सहजपणे ओळखता येते..फळाची पक्वता तपासण्यासाठी साधनेरिफ्रॅक्टोमीटरआंब्याची पक्वता समजण्यासाठी फळांमध्ये एकूण विद्राव्य घटक ( TSS) किती प्रमाणात वाढले हे तपासले जाते. त्यासाठी फळाचा गर काढून त्याचा रस रिफ्रॅक्टोमीटरवर दोन-तीन थेंब टाकावा. एकूण विद्राव्य घटकाची टक्केवारी सात किंवा साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास फळ काढणीस योग्य असल्याचे समजावे. मात्र, त्यापेक्षा टीएसएस कमी असल्यास अजून फळ पक्व झालेले नसते. निर्यात किंवा दूरच्या अंतरावर फळे पाठविण्यासाठी (म्हणजे फळ जास्त दिवस टिकण्यासाठी) साडेसात ते साडेआठ असावी. मात्र आपणास लगेच फळ पिकवून विकायचे असल्यास टीएसएस अगदी दहा टक्केपर्यंत असला तरी चांगले मानले जाते..प्रेशर टेस्टरफळाचा नरमपणा तपासण्यासाठी प्रेशर टेस्टर या साधनाचा वापर केला जातो. प्रेशर टेस्टरवरील दाबाची नोंद २२ ते २६ पाउंड प्रती इंच पर्यंत असल्यास फळ काढणीस तयार झाल्याचे समजावे. मात्र ही नोंद त्यापेक्षा जास्त असल्यास अजूनही फळ काढणीस तयार नसल्याचे समजावे..फळाची घनता तपासणीफळाची घनता तपासणे ही एक अतिशय महत्त्वाची व सोपी पद्धत आहे. ती विशेषतः केसर आंब्यामध्ये महत्त्वाची ठरते. झाडावरील काही फळे काढून ती एका पाणी असलेल्या भांड्यामध्ये अलगद सोडावीत. फळ पूर्णतः बुडाल्यास हे फळ काढणीस तयार झाल्याचे समजावे. थोडेसे उघडे असल्यास (ज्याला आपण चौली पडणे असे म्हणतो) हे फळ सुद्धा निर्यातीसाठी किंवा दूरच्या अंतरावर पाठवण्यासाठी काढणी योग्य असल्याचे समजावे. म्हणजे हे फळ काढणीनंतर जास्त दिवस टिकते. मात्र फळ पाण्यात बरेच तरंगायला लागले आणि त्याचा बराच भाग उघडा दिसल्यास हे फळ अजूनही काढणीयोग्य नसल्याचे समजावे..Mango Harvesting : काढणीयोग्य आंबा कसा ओळखावा?.गराचा रंगयामध्ये फळ काढून त्यास चाकूने कापून गराचा रंग पहावा. हा रंग जर दुधाळ म्हणजे एकदम पांढरा असेल तर फळ अजूनही कोवळेच असल्याचे समजावे.गराचा रंग पिवळसर झालेला असल्यास काढणीस फळ तयार असल्याचे समजावे..आंबा काढणीची शास्त्रीय पद्धतीफळ काढण्यासाठी प्रथमतः मजुरांना प्रशिक्षित करावे. काढणी व त्याच्या प्रशिक्षणासाठी शक्यतो अनुभवी मजुरांचा उपयोग करावा.झाडावरील सर्व फळे एकदाच न काढता ती तीन-चार वेळेस पक्वतेच्या हिशोबाने काढावी. असे केल्यास आणखी एक फायदा म्हणजे सुरुवातीला मोठी फळे काढली जातात. लहान फळे दुसऱ्या काढणीपर्यंत बऱ्यापैकी मोठी झालेली असतात. त्यासाठी बागेला पाणी देण्यासारखी व्यवस्थापनाची कामे जरूर करावीत..फळांची काढणी ही सकाळी सहा ते नऊ किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करावी. या वेळी वातावरण थंड असते. अशा वातावरणात काढलेली फळे पुढे पिकल्यानंतर अतिशय चांगल्या प्रतीची असतात.फळे काढण्यासाठी स्टीलची कात्री किंवा लहान सिकेटर वापरणे सोयीचे ठरते.फळे हातानेच काढावे.किंवा झाडे मोठी असल्यास निदान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या खास झेल्याचा वापर करावा. खुडी आणि अन्य कोणत्याही झेल्यांचा वापर शक्यतोवर टाळावा..फळे काढताना चार ते सहा सेंटिमीटर देठ ठेवून काढावीत. देठ कापताना फळ डाव्या हातात धरून उजव्या हाताने कापावे. महत्त्वाचे म्हणजे कापताना देठास थोडाही झटका बसणार नाही. देठाजवळच्या भागातून बाहेर पडणाऱ्या चिकाचा फळावर डाग पडणार नाही, याची काळजी घ्यावी.फळे काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छताही यात फार महत्त्वाची असते. फळे काढल्यानंतर एक एक फळ अगदी अलगद क्रेटमध्ये ठेवावे. अगदी थोड्या अंतरावरूनही फळ आदळू नये..प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये ओला कपडा निर्जंतुक करून दोन थरांत अंथरून ठेवावा. क्रेटच्या कडेला सुद्धा कपड्याच्या कडा थोड्या वर आलेल्या असाव्यात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फळे काढणीनंतर फळांना थोडेही ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी क्रेट लगेच सावलीत न्यावेत. फळे भरल्यानंतर क्रेट कापडाने झाकून वाहतूक करावयाच्या वाहनापर्यंत आणावे. रिकामे क्रेट सुद्धा उन्हात ठेवू नये. कारण त्याचे तापमान वाढल्यास त्याचे चटके फळाला बसू शकतात. फळे काढल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यांचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी..इतकी काळजी घेतल्यास आपल्या आंबा फळांचा दर्जा बाजारपेठेत पोहोचेपर्यंत व त्यानंतर ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत नक्कीच चांगला राहील, यात शंका नाही.- डॉ. भगवानराव कापसे ९४२२२९३४१९लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.