खरीप पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच अपेक्षित उत्पादन काढण्यासाठी पिकांमध्ये आंतरमशागतीचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये पिकांची प्रति हेक्टरी योग्य संख्या राखण्यासाठी विरळणी करणे, नांगे भरणे, वाढीसाठी वेळीच तण नियंत्रण करणे याबरोबरच पिकांवर पाण्याचा ताण पडू नये म्हणून जलसंधारण सरी काढणे या कामांचा समावेश होतो. विरळणी आणि नांगी भरणे बहुतांशी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पिकांची अपेक्षित उत्पादकता मिळण्यासाठी प्रति हेक्टरी झाडांची संख्या योग्य राखावी लागते. त्यासाठी योग्य अंतरावर पेरणी करणे आवश्यक असते. त्यानंतर ७ ते १० दिवसांमध्ये नांगे भरणे, तर १० ते १२ दिवसांमध्ये विरळणी करणे गरजेचे आहे . लागवडीनंतर या अवस्थेमध्ये पिके असलेल्या शेतकऱ्यांनी नांगी भरून किंवा विरळणी करून घ्यावी. उशिरा नांगी भरल्यास त्याची तुलनात्मक वाढ समाधानकारक होत नाही. विरळणी उशिरा झाल्यास मुळे तुटण्याची शक्यता असते. तण व्यवस्थापन
खरीप हंगामातील पिकांत तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. पिकांच्या वाढीच्या काळात तणे पोषकतत्व, पोषणद्रव्य व जमिनीतील पाणी यासाठी पिकांसोबत स्पर्धा करतात. किडींना आश्रय देतात. परिणामी तणांमुळे पीक उत्पादनात ३५-७० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ही उत्पादनातील घट तणांचा प्रकार, तणांची घनता व तणनियंत्रणाचा कालावधी यांवर अवलंबून असते. या हंगामात प्रामुख्याने हराळी, लव्हाळी, कुंदा, दुधी, कोंबडा, हजारदाणा, गाजर गवत, आघाडा, केना, कुंजर, पांढरी फुली, एकदाणी, कंबरमोडी, चिकना, रायमोनिया, गोखरु इ. प्रचलित तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पहिल्या २० ते ३५ दिवसांचा काळ हा पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यादरम्यान आवश्यकतेनुसार २ ते ३ निंदणी किंवा कोळपणी करून पिके तणमुक्त ठेवावीत. हमखास पावसाच्या क्षेत्राकरिता, मध्यम ते भारी जमिनीकरिता - कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर व ज्वारी अधिक तूर आंतरपीक पद्धती अंतर्गत २.७० मीटर अंतरावर (६ ओळीनंतर) जलसंधारण सरी काढून घ्यावी. यामुळे मुलस्थानी जलसंधारण होऊन पिकांचे अधिक उत्पादन मिळते. तुलनात्मक कमी कार्यक्षम पर्यायी मुलस्थानी जलसंधारणासाठी ५.४० मीटर अंतरावर (१२ ओळी नंतर) जल संधारण सरी काढावी. किंवा उभ्या पिकातील ४ ओळीनंतरच्या सऱ्यांही मुलस्थानी जलसंधारणासाठी उपयुक्त ठरू शकतात. कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर व ज्वारी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीकरिता, पावसाच्या खंडाच्या काळात जमिनीतील ओलाव्याच्या ताण कमी करण्यासाठी पिकामध्ये मातीचे आच्छादन (अतिरिक्त कोळपणीद्वारे ) करावे. सोयाबीन किंवा इतर जैविक घटकांचा आच्छादनासाठी एकत्रित वापर करावा. जमिनीत हमखास पावसाच्या मध्यम खोल काळ्या जमिनीत तुरीच्या बीएसएमआर ७३६ या वाणाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कळी येण्याची वेळ, फुलावर असताना आणि शेंगा भरतांना असा संवेदनक्षम अवस्थांमध्ये तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्रत्येक दोन ओळीत एक सरी काढून पाणी देण्याची व्यवस्था करावी. कापूस पिकात शेंडे व पाने खुडणे- भारी जमिनीत विशेषत: रासायनिक खते व पाणी जास्त दिल्यास तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते. परिणामी बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते. बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो. यासाठी पीक १०० ते ११० दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडावा. यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडाचा आकार वाढतो, बोंडे सडत नाहीत यासोबतच कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुरीच्या मध्यम ते उशिरा कालावधीच्या वाणामध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले असल्यास सोयाबीन काढणीनंतर १५ दिवसात तुरीवर युरिया २ टक्के द्रावणाची (२० ग्रॅम प्रती लीटर पाणी) फवारणी करावी. संपर्क- प्रितम भुतडा (साहाय्यक प्राध्यापक), ९४२१८२२०६६ डॉ. जे. ई. जहागीरदार, (विभाग प्रमुख ), ७५८८५९८२५४ ( कृषी विद्यावेत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)