जमीन सुपीकता महत्त्वाची...

कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेऊन प्रत्येक सरीमध्ये टाकावे. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी फिरवावी. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय घटक पूर्णपणे झाकले जाऊन कुजण्याची क्रिया वेगाने सुरु होते.
Green crops are beneficial for maintaining soil fertility
Green crops are beneficial for maintaining soil fertility
Published on
Updated on

नुकतेच फुलोऱ्यात आलेल्या हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेऊन प्रत्येक सरीमध्ये टाकावे. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी फिरवावी. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय घटक पूर्णपणे झाकले जाऊन कुजण्याची क्रिया वेगाने सुरु होते. ताग, धैंचा, मूग, उडीद, चवळी व बरसीम यासारखी द्विदल पिके शेतात वाढवून नंतर ती त्याच शेतात गाडली जातात. ही पिके ४५ ते ५० दिवसापर्यंत आणि पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर त्याची कापणी करून नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. ही पिके ४५ दिवसाची झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पदार्थांचे अधिक उत्पादन मिळते, मात्र ह्युमसचा पुरवठा कमी होतो. पण हिरवळीची पिके ६० ते ७० दिवसांची असताना जमिनीत गाडली असता जमिनीस ह्युमसचा पुरवठा होऊन अन्नद्रव्यांचा पुरवठासुद्धा वाढतो. तागामुळे ९० किलो नत्र आणि धैंचामुळे ७० किलो नत्र प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळले जाते. शेतात गाडलेल्या हिरवळीच्या पिकाचे विघटन होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पीक लागवड करता येते.हिरवळीचे खत म्हणून करंज, भेंड, अंजन आणि गिरीपुष्पाचा पाला जमिनीत मिसळता येतो. हिरवळीचे पीक लवकर आणि भरपूर वाढणारे असावे. पीक रसरशीत आणि तंतूमय असावे. त्यामुळे ते जमिनीत लवकर कुजते. पीक कोणत्याही जमिनीत वाढणारे आणि शेंगावर्गीय असावे. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावे. पिकाला सिंचनाची सुविधा असावी, त्यामुळे त्याची चांगली वाढ होते. हिरवळीच्या खताचे फायदे 

  • प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्र जमिनीत मिसळले जाते.
  • मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते.मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.
  • शेंगावर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ टन शेणखताच्या बरोबर असते. हिरवळीच्या पिकाच्या आच्छादनाने जमिनीची धूप होत नाही.
  • हिरवळीच्या खतांचे प्रकार शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते हिरवळीचे पीक शेतात सलग ,मिश्र किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात. त्याच शेतात ते पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून मिसळतात. या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैंचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो. हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत पडीक जमिनीवर किंवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडली जातात. किंवा पडीक जमीन किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त झाडांची लागवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणी किंवा चिखलणीच्यावेळी जमिनीत मिसळली जातात. हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी, करंज, सुबाभूळ, टाकळा, किंजळ यांची हिरवी पाने, कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात. हिरवळीचे खत तयार करण्याच्या पद्धती 

  • निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. ही पिके ६ ते ८ आठवड्यांत फुलोऱ्यावर येतात. ही पिके ज्या शेतात घेतली असतील तेथेच खत तयार करावे. हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत. यावेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढविता येईल.
  • नुकतेच फुलोऱ्यात आलेल्या हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेऊन नांगराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे. नंतर नांगराच्या दुसऱ्या तासाच्या वेळी किंवा भात पिकाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय घटक पूर्णपणे झाकले किंवा दाबले जाऊन कुजण्याची क्रिया वेगाने सुरु होते.
  • हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो. यासाठी सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून किंवा पावसाच्या सुरवातीस करून ऑगस्टमध्ये गाडणी करावी. हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
  • उपलब्ध काडी कचरा व गवताचे ढीग शेतात जागोजागी कुजण्यास ठेवावेत. योग्यवेळी जमिनीत गाडावेत. कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फूट x ३.५ फूट खड्ड्यात गवत व काडी कचरा कुजवता येईल.
  • हिरवळीच्या खतांची पिके  ताग / बोरु 

  • ताग हे हिरवळीचे उत्तम खत आहे.ज्या विभागात पुरेसा पाऊस किंवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घ्यावे. सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मीय जमीन तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
  • पावसाळ्याच्या सुरूवातीस हेक्टरी ५० ते ६० किलो तागाचे बी पेरावे.पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० सें.मी. उंची वाढली असताना नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.
  • धैंचा 

  • तागापेक्षा काटक हिरवळीचे हे पीक आहे. कमी,पर्जन्यमान ,पाणथळ ठिकाण ,क्षारपड किंवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्दा हे पीक तग धरु शकते.
  • या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावर गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
  • पावसाळ्याच्या सुरूवातीस हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे शेतात पेरावे. रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सें.मी.उंचीपर्यंत वाढले असता जमिनीत नांगराने गाडावे. धैच्यापासून हेक्टरी १० ते २० टनांपर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते.
  • या वनस्पतीमध्ये नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्के असते. भात लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.
  • घेवडा  हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते.पाणथळ जमिनीत हे पीक योग्य नाही. पावसाळ्याच्या सुरवातीला प्रती हेक्टरी ५० किलो बियाणे लागते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जमिनीत गाडावे. सेंजी  रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे. पिकाला सिंचनाची आवश्यकता असते. हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे लागते. जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडावे. उसासाठी हे योग्य हिरवळीचे खत आहे. द्विदल पिके  पावसाळ्याच्या सुरवातीस जमीन तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरावे. या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाठी चांगला उपयोग होतो. जमिनीची पूर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यांचे प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडावे. यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० किलो नत्राचा पुरवठा होतो. गिरीपुष्प (ग्लिरीसिडिया) 

  • झुडुप वर्गातील हे हिरवळीच्या खताचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येते.
  • लागवड छाट कलमाद्वारे करण्यासाठी ३० सें.मी. लांब ३ सेंमी व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x ३० x ३० सेंमी. आकाराचा खड्डा करून बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. याचबरोबरीने गादी वाफे तयार करून किंवा प्लॅस्टिक पिशवीत बी पेरून रोप तयार करावे.
  • रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुसऱ्या वर्षांपासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो.
  • या झाडाच्या फांद्याची वरच्यावर छाटणी करून नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते. गिरीपुष्पाची पाने धैचा,मेंड आणि वनझाडाचा पालापाचोळ्यापेक्षा जलद कुजतात.
  • गिरीपुष्पाच्या पानांमध्ये सेंद्रिय कर्ब ३६ टक्के,नत्र २.७० टक्के ,स्फुरद ०.५ टक्के व पालाश १.१५ टक्के आहे. नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्पाचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा.
  • संपर्कः  डॉ. दीपाली कांबळे,९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com