शेतकरी : मुरलीधर गोरे गाव : बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी एकूण क्षेत्र : ४५ एकर तूर क्षेत्र : २५ एकर (तूर अधिक सोयाबीन आंतरपीक) माझी बोरी (ता. जिंतूर) शिवारात हलकी ते मध्यम प्रकारची ४५ एकर जमीन आहे. त्यापैकी डाळिंब ६ एकर आणि सीताफळ ३ एकर अशी एकूण ९ एकरांवर फळबाग लागवड आहे. सीताफळामध्ये शेवगा लागवड केलेली आहे. खरिपामध्ये उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन आणि तूर ही पिके घेत असतो. दरवर्षी साधारणतः २५ एकर क्षेत्रावर तूर अधिक सोयाबीनचे आंतरपीक असते. गेल्या ७ वर्षांपासून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करत आहे. या वर्षीचे नियोजन
दरवर्षी पावसाळ्यात जमिनीमध्ये ओलावा उपलब्ध झाल्यानंतर पेरणीचे नियोजन केले जाते. पेरणीपूर्वी बियाण्यांस ट्रायकोडर्मा बुरशीनाशक आणि रायोझोबियम, पीएसबी या जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया केली जाते. त्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होते. मागील वर्षीपर्यंत बीबीएफ यंत्राने सोयाबीनच्या ६ ओळींनंतर तुरीच्या २ ओळी या पद्धतीने पेरणी करत होतो. यामध्ये सोयाबीनच्या दोन ओळींतील अंतर १३ इंच आणि तुरीच्या दोन ओळींतील अंतर २० इंच ठेवले जायचे. या वर्षी १ जुलै रोजी बीबीएफ यंत्राद्वारे गादीवाफ्यावर तूर लागवडीचा प्रयोग केला आहे. सोयाबीनच्या ६ ओळींनंतर तुरीच्या २ ओळी यापद्धतीने पेरणी केली आहे. सोयाबीनच्या दोन ओळींमध्ये साडेसोळा इंच अंतर असून, प्रत्येक तीन ओळींनंतर २३ इंचाची सरी सोडली आहे. अडीच फूट रुंदी आणि ६ इंच उंचीच्या गादी वाफ्यावर झिक-झॅक (जोडओळ) पद्धतीने तुरीची लागवड केली आहे. तुरीच्या दोन ओळींतील अंतर १८ इंच आणि जोडओळींतील अंतर १० फूट एवढे आहे. प्रत्येक जोडओळीच्या दोन्ही बाजूंनी सरी सोडल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. त्यामुळे मूळसड होत नाही. तसेच सोयाबीन काढणीनंतर दोन्ही बाजूंच्या सऱ्यांमधून तुरीस पाणी देणे शक्य होते. पेरणीच्या वेळी सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग (प्रतिबॅग ५० किलो), पोटॅश २५ किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रति एकर या प्रमाणात दिले. पेरणीनंतर ११ दिवसांनी तणनाशकांच्या फवारणीसोबत चक्री भुंग्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. दर २१ दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्ये तसेच १३ः०ः४५ या खताची फवारणी केली जाते. गाठी धरण्याच्या अवस्थेत पहिली, शेंगा लागण्याच्या अवस्थेत दुसरी आणि गरज पडल्यास कीटकनाशकांची तिसरी फवारणी केली जाते. एक ऑगस्ट रोजी तुरीला बांगडी पद्धतीने १०ः २६ः२६ खताची एकरी २० किलो मात्रा दिली आहे. त्यानंतर खुरपणी करून मजुरांकडून तुरीचे शेंडे खुडून घेतले. अतिवृष्टीमुळे पीक पिवळसर दिसू लागले होते. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १३ः०ः४५ आणि कॉपर ऑक्सिक्लोराइडची आळवणी (ड्रेंचिंग) केली. पुढील १० ते २० दिवसांचे नियोजन
तुरीच्या दोन ओळींमध्ये १९ः१९ः१९ पहिली फवारणी ८ ऑगस्टला केली आहे. दुसरी फवारणी १२ः६१ः००, तिसरी ००ः५२ः३४ आणि चौथी १३ः०ः४५ या विद्राव्य खतांची फवारणी करणार आहे. या फवारणीमुळे फळफांद्यांची संख्या वाढते, फुलधारणा चांगली होते तसेच दाण्याची प्रत सुधारते. त्यामुळे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळण्यास मदत होते. या वर्षी उत्पादनात एकरी १ ते दीड क्विंटल वाढ अपेक्षित आहे. - मुरलीधर गोरे ः ८३२९४३७०९३