कृषी सल्ला (आंबा, काजू, सुपारी, नारळ, कलिंगड, वाल, चवळी)

हवामान पूर्वानुमानानुसार तापमानात वाढ होऊन आर्द्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा वातावरणात फळधारणा झालेल्या आंबा बागेमधील वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते.
pest infestation on mango
pest infestation on mango

हवामान पूर्वानुमानानुसार तापमानात वाढ होऊन आर्द्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा वातावरणात फळधारणा झालेल्या आंबा बागेमधील वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते. हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान कमाल आणि किमान तापमानात वाढ संभवते. आंबा अवस्था:  मोहोर ते फळधारणा

  • हवामान पूर्वानुमानानुसार तापमानात वाढ होऊन आर्द्रतेत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा वातावरणात फळधारणा झालेल्या आंबा बागेमधील वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते. ही फळगळ कमी करण्यासाठी पाणी उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने फळे सुपारीच्या आकाराच्या अवस्थेपर्यंत द्यावे.
  • नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोन वेळा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • आंबा फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.
  • कीड, रोगनियंत्रण 

  • फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फळांना २५ × २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. यामुळे फळगळ कमी होणे, फळाचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे, फळातील साक्याचे प्रमाण कमी करणे आणि फळमाशीपासून संरक्षण करणे शक्य होते.
  • मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावर तुडतुडे, मिजमाशी इ. किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतात. त्यासाठी मोहोर फुलण्यापूर्वी तुडतुडे आणि मिजमाशीच्या नियंत्रणासाठी आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के ) ०.५ मि. लि. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • आंबा मोहोरावर आणि फळांवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहोराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात. मोहोर काळा पडून गळून जातो. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फुलकिडींच्या नियंत्रणासाठी स्पीनोसॅड (४५ टक्के ) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाडावर फवारावे.
  • ( टीप : मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून सकाळी ९ ते १२ किंवा सायंकाळी ३ वाजल्यानंतर फवारणी करावी.)

  • आंबा फळधारणा होऊन वाटाणा आकाराच्या अवस्थेत असताना फळांवर तुडतुड्याचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यू. जी.) ०.१ ग्रॅम अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या द्रावणात भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ०.५ मि.लि. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळून वापरावे.
  • मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार चौथ्या ते सहाव्या फवारणीत फळगळ कमी करण्यासाठी २ टक्के युरिया (२० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) फवारावे. यासाठी प्रथम युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावा. नंतर त्यात कीटकनाशक टाकावे.
  • या अगोदर फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावाकडे झाडाचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास उपाययोजना कराव्यात.
  • टीप

  • शिफारशीत दिलेली कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची मात्रा ही नॅपसॅक पंपासाठी आहे.
  • वरील कीडनाशकांच्या फवारणीसाठी ॲग्रेस्को शिफारस आहे.
  • काजू

  • अवस्था :  फळधारणा
  • फळधारणा झालेल्या फळांवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • नियंत्रण :  (फवारणी प्रति लिटर पाणी)

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा
  • ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम
  • या कीटकनाशकांस लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस आहे.
  • टीप ढेकण्या कीड सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सक्रिय असल्याने किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर करावी. याआधी फवारणी घेतली असल्यास कीड व रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडाचे निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास उपाययोजना कराव्यात.

  • तापमानात वाढ व आर्द्रतेत घट फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
  • काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • नारळ

  • तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवते. नवीन लागवड केलेल्या नारळ बागेस पाणी देण्याची व्यवस्था करावी. माडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
  • नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू शकतात. ते रोखण्यासाठी रोपांना वरून सावली करावी.
  • सुपारी

  • अवस्था   :  फळधारणा
  • तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवते. सुपारी बागेस पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • फळबाग रोपवाटिका

  • तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने फळबाग रोपवाटिकेस पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • फळबाग रोपवाटिकेतील गवत काढून स्वच्छता ठेवावी व गरजेनुसार रोपांसाठी सावली करावी.
  • वाल, चवळी

  • अवस्था :  शेंगा
  • वाल पीक फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील असते. वाल पिकास फुलोरा येण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी.
  • कलिंगड

  • अवस्था:  फळधारणा
  • फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. पाण्याच्या अनियमित पाळ्या दिल्यास फळे तडकण्याची शक्यता असते.
  • कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.
  • संपर्क: ०२३५८- २८२३८७ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com