
औरंगाबाद : पशुधन संगोपन (Animal Rearing) करताना चारा व्यवस्थापन (Fodder Management), गोठ्याची स्वच्छता, योग्य वेळी योग्य लसीकरण (Animal Vaccination) या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड, औरंगाबाद व लुपिन फाउंडेशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमत त्या बोलत होत्या.
या वेळी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर तसेच लुपिन फाउंडेशनचे बाळासाहेब गर्जे, पाणी फाउंडेशनचे बेग, गावच्या सरपंच श्रीमती जंगले, उपसरपंच व शेतकरी आणि महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
डॉ. जिंतुरकर म्हणाल्या, की शेळीपालनामध्ये उस्मानाबादी शेळी तर कुक्कुटपालनामध्ये ग्रामप्रिया या दोन जाती अत्यंत चांगल्या आहेत. महिलांनी शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायाकडे वळावे जेणेकरून त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येण्यास हातभार लागू शकतो. पशुपालकांनी आपल्या पशुधनासाठी अझोला या शेवाळवर्गीय पशुखाद्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अझोला या खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते.
डॉ. भावर यांनी आंबा पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी या वेळी सविस्तर मार्गदर्शन केले. फळ पिकांची लागवड करत असताना योग्य प्रमाणामध्ये खड्डे तयार करणे व फळबागांची लागवड करत असताना त्या-त्या फळबागांमधील चांगल्या वाणांची निवड करावी. जेणेकरून आपली बाग ही शाश्वत स्वरूपामध्ये राहील.
तसेच फळबाग लागवड करत असताना मातीचे परीक्षण करूनच फळबाग लागवड करावी. आंबा, चिंच, पेरू, सीताफळ या फळपिकांची लागवड करायची असेल तर या सर्व पिकांची शाश्वत रोपे लावावीत. ही रोपे कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद येथे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच पद्धतीने बोर्डो पेस्टचा प्रभावी वापर फळ पिकांमध्ये करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी मार्गदर्शन करताना उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
डॉ. पिसुरे यांनी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादद्वारे शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी माहिती दिली. श्री. गर्जे यांनी लुपिन फाउंडेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी शेतकरी बांधवांना माहिती दिली तसेच या फाउंडेशनमार्फत शेतकरी बांधवांनी एकात्मिक पीक पद्धती, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच महिला गट इत्यादीच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी करावी, असे आवाहन केले. या वेळी पाणी फाउंडेशनचे श्री बेग यांनीही मार्गदर्शन केले.
या वेळी गावातील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञानाद्वारे उत्तरे देण्यात आली. तसेच गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांना लुपिन फाउंडेशनमार्फत चारा पिकाच्या बियाण्यांचे वाटपदेखील राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.