
Latur News : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भंगेवाडी -महादेववाडी, लामजना, उत्का व आलमला या गावांमध्ये लम्पी स्कीनचे रुग्ण आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
संबंधित पशुपालकांची भेट घेऊन लसीकरणाचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाय, आणि औषधोपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, लम्पी रोगावर पशुसंवर्धन विभागाने एकदिवसीय चर्चासत्राचेही आयोजन केले होते.
लम्पी स्कीन विषाणूजन्य असून त्यावर वेळेवर उपचार केल्यास जनावरांची सद्यःस्थिती सुधारत आहे व बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. बाधित पशुधन औषधोपचारास उत्तम प्रतिसाद देत असून उपचारातून बरे होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. पशुपालकांनी ‘लम्पी’ची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले.
दरम्यान, जनावरांचे लसीकरण करून, योग्य निगा राखून लम्पीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लम्पी स्कीन प्रतिबंध व उपचार विषयक जिल्हास्तरीय ऑनलाइन मार्गदर्शन सत्र घेण्यात आहे. यात नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी मार्गदर्शन केले. लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी व पशुपालकांना योग्य वैज्ञानिक मार्गदर्शन मिळावे यासाठी एक विशेष ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सर्व १३२ पशुवैद्यकीय संस्थांचे प्रमुख, सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्यासह प्रादेशिक सह आयुक्त डॉ. नाना सोनवणे व जिल्हा उपायुक्त डॉ. शिंदे यांची या वेळी प्रमुख उपस्थित होती. लम्पी हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे दरवर्षी वेळेवर लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.
सर्व गोवर्गीय जनावरांना वेळेवर लस देणे आवश्यक आहे. रोगाच्या सुरुवातीस जनावराची काळजीपूर्वक देखभाल ही औषधोपचारांपेक्षा अधिक परिणामकारक ठरते. औषधांमध्ये फक्त आवश्यक तेवढा प्रतिजैविक व जीवनसत्त्वयुक्त उपचारांचा वापर करावा. जनावरांना मऊ हिरवा अल्फाल्फा, गव्हाची पात, ज्वारीचा चारापणा द्यावा. चारा स्वच्छ व गरज असल्यास हाताने चारा खाऊ घालावा, कारण गाठी व वेदनेमुळे जनावर स्वतः खाणे टाळते.
नेहमी कोमट व स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. पाण्यात गूळ व थोडेसे मीठ टाकून दिल्यास ऊर्जा वाढेल, आदी सुचना डॉ. भिकाने यांनी केल्या. गाठी, सूज व वेदनांवर गरम मिठाच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीनवेळा शेक द्यावा.
जनावरांसाठी शांत, हवेशीर व स्वच्छ निवारा द्यावा. बाधित जनावराला इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. लिंबू, करंज, कडुनिंब तेल, साबण व पाणी यांचे मिश्रण अंगाला लावल्यास गोचीड, गोमाश्यांपासून संरक्षण मिळते, असेही डॉ. भिकाने यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.