डॉ. आर. पी. चिकनकर,
डॉ. पी. पी. घोरपडे
Animal Care : पावसाळा सुरू झाला की शेळ्या, मेंढ्यांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हे टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गोठ्यातील दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. श्वसनसंस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते. ही आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी पेटवावी किंवा ६० वॉटचा विजेचा बल्ब लावावा.
पावसाळ्यात गोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा. तसेच शेडमधील जमिनीवर ही चुना टाकल्याने शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. दररोज स्वच्छता करून गोठा कोरडा ठेवावा. गोठा ओला असल्यास खुरामध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येऊन त्या लंगडतात,ताप येतो,अशक्त होतात.
पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसतात व तेथे अंडी घालतात त्यामुळे जखम वाढत जाते. माशांच्या नियंत्रणासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
पावसाळ्यातील व्यवस्थापन
शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशक शिफारशीत प्रमाणात देऊन जंतनिर्मूलन करून घ्यावे. कारण दमट हवामान जंताच्या वाढीसाठी उपयुक्त असते.
शेळ्यांना पावसाळा सुरु होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प, पीपीआर आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
पावसाळ्यात खुरामध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात. यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटने धुवून त्यावर मलमपट्टी करावी.
पावसाळ्याच्या दिवसात शेळी खरेदी करणे टाळावे. कारण पावसाळ्यात आजार संक्रमण होण्याची शक्यता असते. जर मेंढी-शेळी खरेदी करणे खूपच गरजेची असेल तर जिथून शेळ्या खरेदी करायच्या आहेत, तेथे आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही याची तपासणी करावी.
पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे लसीकरण करावे.
पावसात जास्त वेळ भिजल्यास न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट हिरवा/पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते.
आहार नियोजन
शेळ्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आवश्यक हिरवा आणि वाळलेला चारा तसेच संतुलित खुराक द्यावा.
पावसाळा सुरू होण्याच्या दोन आठवड्यापूर्वी मेंढी - शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार हिरव्या चाऱ्यासोबत संतुलित खुराक दिल्यास पावसाळ्यात त्यांची प्रतिकार शक्ती उत्तम राहील.
कोरडा चारा आणि इतर खाद्याची साठवण योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे कारण त्यास बुरशी लागण्याची शक्यता असते.
चाटण वीट किंवा खुराकामध्ये खनिज मिश्रण सुरू ठेवणे गरजेचे असते कारण शेळ्या किंवा करडे खनिजांच्या अभावामुळे माती चाटतात. खानिजाच्या अभावामुळे इतर आजार होतात.
कोवळ्या चाऱ्यात तंतुमय पदार्थ कमी असतात. जर असा चारा जास्त खाऊ घातला तर त्यांना अपचन होण्याची शक्यता जास्त असते.
पोटफुगी, हगवण यांसारखे आजार होतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.
बोकडांना देखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवस तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम प्रतिदिन खुराक दिल्यास वीर्याचे प्रमाण आणखी सुधारते.
चारा कुट्टी करून खायला दिल्याने जमिनीवर चारा पडून तो खराब होत नाही.
पावसाळ्यात शेळ्या, मेंढ्यांना दिले जाणारे पाणी स्वच्छ असावे.
- डॉ. आर. पी. चिकनकर, ७७७५८६०५८९
(पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.