
शेतकरी ः रमेश रामचंद्र माळी
गाव ः जत, ता.जत, जि.सांगली.
गीर गायी ः ३२
शेती ः ३७ एकर शेती
जत येथील रमेश माळी यांची ३७ एकर शेती आहे. त्यात १९ एकरावर द्राक्षाच्या विविध वाणांची लागवड आहे. तर उर्वरित क्षेत्रामध्ये हंगामनिहाय पिकांसह चारा पिकांची लागवड केली जाते. रमेश यांनी फळबागेला गीर गोपालनाची जोड दिली आहे. गोपालनातून उपलब्ध होणारे शेणखत आणि गोमूत्र यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.
रमेश यांचे वडील रामचंद्र माळी यांना १९७१ मध्ये माळरानावरील रस्त्यामध्ये सोडून दिलेले अशक्त खिलार जातीचे (Khilar Breed) वासरू सापडले. ते त्यांनी घरी आणले. त्यातूनच देशी गायींच्या संगोपनाची (Indigenous Cow Rearing) आवड निर्माण झाली. पुढे टप्प्याटप्प्याने १५ खिलार गाई (Khilar Cow) घेतल्या. साधारण २०१० पर्यंत त्या गायींचे संगोपन (Cow Rearing) केले. त्यानंतर रमेश यांनी गीर जातीच्या (Gir Cow) २ गायी विकत आणल्या. हळूहळू गीर गायींच्या संख्येत वाढ करत २०१६ मध्ये सहा गीर गायी आणि ६ वासरे विकत आणली. दावणीला जातिवंत जनावरांची पैदास झाली पाहिजे, यासाठी गीर वळूदेखील खरेदी केला. त्यापासून पुढे चांगली पैदास गोठ्यातच झाली. सध्या दावणीला ३२ गीर जातीच्या गायी आणि १ वळू आहे. गाईंसाठी साधारण २४ बाय ९० फूट आकाराचा गोठा बांधण्यात आला आहे. गीर गायींच्या दूध आणि तुपाची विक्री केली जाते.
व्यवसायासाच्या सुरवातीस गीर गाईचे दूध आणि तूप विक्री करण्याचे मोठे आव्हान होते. ग्रामीण भागात कोणीही दूध आणि तूप खरेदी करत नव्हते. त्यामुळे शहरातील लोकांपर्यंत पोहोचलो. सुरवातीला त्यांना मोफत गीर गाईचे दूध दिले. लोकांमध्ये गीर गायीच्या दूध आणि तुपाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दूध आणि तुपाला मागणी वाढत गेली. गोपालनातून मिळणारे शेणखत आणि स्लरीचा वापर शेतामध्ये होतो. त्यामुळे रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होत असल्याचे रमेश सांगतात.
व्यवस्थापनातील बाबी ः
- दररोज सकाळी सहा वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते.
- प्रथम शेण, मलमूत्र काढून गोठा, दावण स्वच्छ केली जाते.
- त्यानंतर सात ते आठ या वेळेत दूध काढले जाते. त्यानंतर गायींना चारा दिला जातो.
- सकाळी आणि संध्याकाळी कडबा कुट्टी ५ किलो आणि गोळी पेंड अर्धा किलो प्रति गाय याप्रमाणे दिली जाते.
- सकाळी नऊच्या सुमारास गाई चरण्यासाठी माळरानात सोडल्या जातात. यामुळे गायींचे आरोग्य उत्तम राहते.
- सायंकाळी ५ वाजता पुन्हा गायी गोठ्यात आणून बांधल्या जातात. गोठ्यामध्ये ओला चारा दिला जातो.
- या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुका आणि ओला चाऱ्याची तजबीज आधीच करून ठेवली जाते.
आरोग्यविषयक काळजी ः
गायींचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यादृष्टीने दररोज सकाळी गोठा स्वच्छ केला जातो. साधारण ५ ते ६ दिवसांनी पाण्याने गोठा धुतला जातो. पंधरा दिवसांतून १ वेळ गोचिड नियंत्रणाची मात्रा दिली जाते. आजारी गायींची पशुवैद्यकांकडून गोठ्यामध्येच तपासणी केली जाते. लसीकरण, गाभणकाळ आदी बाबींची तपशीलवार नोंद ठेवली जाते.
दूध उत्पादन व विक्री ः
- सध्या गोठ्यामध्ये चार दुधाळ आणि १५ गायी गाभण आहेत.
- दुधाळ गायींपासून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळचे साधारण २० लिटर दूध उत्पादन मिळते. सर्व दुधाची गावामध्येच ७० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते.
- यासह महिन्याला साधारण ७ ते ८ किलो तूप तयार होते. प्रति किलो अडीच हजार रुपये दराने तुपाची विक्री केली जाते.
--------------
- रमेश माळी, ९८५००५४४१६
(शब्दांकन ः अभिजित डाके)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.