
शेतकरी ः विश्वंभर बालाजी कदम
गाव ः धामदरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड
एकूण जनावरे ः १७
गायी ः १३
म्हशी : चार
नांदेड जवळील धामदरी (ता. अर्धापूर) येथे विश्वंभर बालाजी कदम यांची वडिलोपार्जित ५ एकर जमीन आहे. घरच्या दुग्धव्यवसायात (Dairy Business) विश्वंभर यांनी लक्ष घालत १५ वर्षांपासून चांगला जम बसविला आहे. सध्या त्यांच्याकडे ४ म्हशी (Buffalo) आणि १३ गायी (Cow Rearing) आहेत. त्यापैकी २ म्हशी आणि १० गायी दुभत्या (Milch Cow) आहेत. सध्या प्रतिदिन दोन्ही वेळचे मिळून गायींपासून ६० लिटर आणि म्हशींपासून २० लिटर दूध उत्पादन मिळते. जनावरांच्या आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापनावर (Animal Feed Management) विशेष भर दिला जातो.
गोठ्याची उभारणी ः
जनावरांसाठी मुक्त संचार गोठा उभारला आहे. तसेच ४० बाय ६० फूट आकाराच्या कच्च्या स्वरूपाच्या गोठा बांधून त्यात गव्हाण उभारली आहे. गोठ्यामध्येच जनावरांना चारा, पाणी उपलब्ध केले जाते.
व्यवस्थापनातील बाबी ः
- दररोज सकाळी पाच वाजता गोठ्यातील कामांस सुरुवात होते. प्रथम शेण आणि मलमूत्र काढून गोठा स्वच्छ धुतला जातो.
- गोठ्यातून दररोज उपलब्ध होणारे शेण गोळा करून साठविले जाते. दरवर्षी साधारण ६० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. प्रति ट्रॉली अडीच ते तीन हजार रुपये दराने शेणखताची विक्री केली जाते.
- गोठा चांगला स्वच्छ केल्यानंतर घरातील सदस्यांच्या मदतीने हाताने दूध काढले जाते. दूध काढल्यानंतर चारा दिला जातो.
- काढलेले दूध सकाळी साडेपाच वाजता दूध संकलन केंद्रावर पोचविले जाते. तेथे गायीच्या दुधाला ३५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४५ रुपये प्रति लिटर इतका दर मिळत आहे.
- गोठ्यामध्ये पाण्यासाठी दहा हजार लिटर पाणी क्षमतेचा हौद आहे. जनावरांना दिवसातून तीन वेळा सकाळी, दुपारी व संध्याकाळी पाणी पाजले जाते.
चारा नियोजन ः
- शेतामध्ये सुपर नेपिअर, ऊस या चारा पिकांची लागवड केली आहे.
- प्रत्येक जनावरास दररोज दोन वेळा ३० किलो चारा कुट्टी दिली जाते. त्यात वाळलेला चारा ८ किलो, हिरवा चारा २२ किलो प्रमाणे दिला जातो.
- वाळलेल्या चाऱ्यामध्ये कडबा, हरभरा भुसकट, सोयाबीन व गव्हाचा भुस्सा दिला जातो. तर ओल्या चाऱ्यामध्ये नेपिअर गवत, ऊस, कडवळ, मका आणि शेतातील काढलेले गवत दिले जाते.
- याशिवाय जनावरांना दररोज दोन वेळ खुराक दिला जातो. या खुराकामध्ये सरकी पेंड, मका, गव्हाचे पीठ, कडधान्य, मीठ, कॅल्शिअम, खाण्याचा सोडा असे सर्व मिश्रण एकत्रित करून दिले जाते. हे मिश्रण दुभत्या जनावरांना ५ किलो तर भाकड जनावरांना २ किलो प्रमाणे दिले जाते.
लसीकरणावर भर ः
जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. दर सहा महिन्याला एफएमडीचे लसीकरण केले जाते. तसेच सध्या उद्भवत असलेल्या लम्पी स्कीन या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. पोखणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण केले जाते. आजारी जनावरांवर त्यांच्या सल्ल्याने उपचार केले जातात.
----
- विश्वंभर कदम, ९६०४० १८३९५
(शब्दांकन ः कृष्णा जोमेगावकर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.