
डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे
सा धारणत: नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत लाळ्या खुरकूत आजाराची (Foot And Mouth Disease) साथ सुरु होते. ती जून महिन्यापर्यंत राहते. हा आजार विषाणूपासून होतो. या विषाणूचे प्रतिकार क्षमतेनुसार वेगवेगळे सात प्रकार आहेत. ज्या जनावरांच्या (Animal) खुरी दुभंगलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव दिसतो. प्रसार झपाट्याने होतो.
प्रमुख लक्षणे
संक्रमण काळ सुमारे ३ ते ७ दिवस आहे.
जनावरास प्रथम ताप येतो. अन्न पाणी कमी होते, थकवा येतो, रुक्षपणा येतो, तोंडातून लाळ गळणे सुरु होते. तोंडात गरमपणा जाणवतो.
जीभ, हिरड्या,ओठ, नाकपुड्यावर फोड येतात. हे फोड फुटल्यानंतर त्याचे व्रणात रूपांतर होते. काही वेळेस जिभेवरील पूर्ण आवरण निघून जाते. त्यामुळे अन्न पाणी घेणे अशक्य ठरते.तोंडातून सारखी लाळ गळत रहाते.
काही वेळेस सड, कासेवर फोड येतात. नंतर व्रण होतात. कासदाह होतो.
खुरीवर फोड येऊन तेथेच फुटतात. यामुळे जखम होते. दुर्लक्ष केल्यास जनावरांचे खूर गळून पडतात. त्यामुळे चालणे मुश्कील होते.
याच काळात जीवाणूंच्या दुय्यम संक्रमणामुळे इतर संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. दुर्लक्ष झाल्यास ९० टक्के जनावरांचा मृत्यू होतो.
दुष्परिणाम
सामान्यपणे: मोठी जनावरे मरत नाहीत; परंतु दूध, मांस लोकर,कातडी उत्पादन आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
आजारातून सावरलेली जनावरे पूर्णपणे पुर्ववत कार्यक्षम होऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये गर्भपात, वंधत्व येणे, अंगावर केसांची वाढ होणे, पंडुरोग होतो. उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते.थोडे ऊन वाढले की जनावरे लाखतात. दुग्धोत्पादन कमी होते.
औषधोपचार
आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर औषधोपचार नाही. लक्षणावरून उपचार करू शकतो. त्यामुळे जनावरांना आराम मिळू शकतो.
जनावरांचे तोंड पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावे. त्यानंतर जिभेवर बोरोग्लीसरीन, लोणी/ खोबरेल तेल आणि हळद यांचे मिश्रण लावा
तोंडात जखमा झाल्यामुळे जनावरास हिरवे कोवळे गवत खाण्यास द्यावे.
पायाच्या जखमा परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवाव्यात. जखमेवर टरपेंन्टाईन टाकून अळ्या काढून टाकाव्यात. त्यानंतर शिफारशीत जंतूनाशक मलम लावावे.
दुय्यम आजाराचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी पशू तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविके व इतर औषधोपचार करावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
वासरांना जन्मल्यानंतर ४५ दिवसांनी आणि नंतर २.५ महिन्यांनी आणि तेथून पुढे दर सहा महिन्यांनी लसीकरण करावे. म्हणजेच सप्टेंबर -ऑक्टोबर आणि मार्च-एप्रिलमध्ये लसीकरण करून घ्यावे. गाभण जनावरांना शेवटच्या काळात लस टोचू नये.
आजारी माद्यांच्या वासरांना त्यांचे दूध पाजू नये. दुसरे दूध द्यावे.
बाधित जनावरांना कुरणात चारू नये. बाधित जनावरे वेगळी बांधावीत. त्यांची निगा वेगळ्या मजुराकडून करून घ्यावी.
- डॉ.बाबासाहेब घुमरे, ९४२१९८४६८१
- डॉ.विकास कारंडे, ४२००८०३२३
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि.सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.