
Nagpur News : ‘शेतकऱ्यांकडून कुक्कुट पक्ष्यांची उचल करणाऱ्या करारदार कंपन्यांच्या वजनात तफावत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून राज्यातील तब्बल ९ लाख पोल्ट्री व्यवसायिकांचे शोषण होत असल्याची शक्यता वर्तवीत या क्षेत्रातील करारदार कंपन्या, ट्रेडर्सकडील वजनकाट्यांची प्राधान्याने तपासणी करावी, अशी मागणी पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी केली आहे. मुंबईस्थित वैद्य मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांकडे एका पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकारातून राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठण करण्यात आले. समितीची बैठक मंगळवारी (ता. ५) पुण्यात झाली.
या वेळी वसेकर यांच्यासमोर समिती सदस्यांनी या क्षेत्रातील अनेक प्रश्न मांडले. त्यामध्ये करारदार कंपन्यांकडून कुक्कुट पक्ष्यांच्या लिफ्टिंगवेळी वजनातील तफावतीतून होणाऱ्या लुटीचाही समावेश होता. वसेकर यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत वैद्य मापनशास्त्र विभागाच्या नियंत्रकांना पत्र लिहीत या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
पत्रानुसार, राज्यात वैयक्तिक तसेच करार पद्धतीने कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. करारदार शेतकरी स्वःच्या फार्मवर पाच ते सहा आठवडे कुक्कुट पक्ष्याचे पालन करून योग्य वजन आल्यावर त्याची विक्री करतात.
कंपन्यांकडून योग्य वजन झालेल्या पक्ष्यांची खरेदी थेट फार्मवरूनच होते. त्याच ठिकाणी कंपन्यांचे ट्रेडर्स वजन काट्यावर वजन करतात. त्याआधारे फार्मच्या मालकांना पक्षिपालनाचा मोबदला दिला जातो. राज्यात यानुसार व्यवसाय करणारे ९ लाख कुक्कुट व्यावसायिक आहेत.
आयुक्तांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांकडून स्वागत
वजनात तफावत आल्याने कुक्कुटपालकास पक्षिपालनाचा पूर्ण मोबदला मिळत नाही. अशा पद्धतीने त्यांचे शोषण होते. त्यामुळे या सर्व ठिकाणच्या वजन काट्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांच्या या भूमिकेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.