
Animal Health Management : मानवी आणि जनावरांमधील अन्न पचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. जनावरांमध्ये जठर हे चार विभागात विभाजित झालेले असते आणि त्यांची शरीररचना जटिल कर्बोदके उदाहरणार्थ हिरवा चारा, ज्वारी/मका धांडांचे पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा तयार करण्यात प्रगत असते.
त्या उलट साधी लवकर पचणारी कर्बोदके म्हणजे पोळी, भात, शिजलेली डाळ जर पाळीव जनावरांच्या (गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी) खाण्यात आली तर त्याचे अती शीघ्र पचन होऊन जठराच्या पहिल्या भागात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. यामुळे जठरातील पचन क्रिया बंद पडत आम्लाचे प्रमाण वाढून जीवघेणी पोटफुगी होऊन उपचाराअभावी अशा जनावराचा मृत्यू ओढवतो.
समारंभातील उरलेले अन्न, शिळी फळे आणि सडका भाजीपाला गैरजबाबदारीने उकिरड्यावर फेकण्यात येतो आणि भुकेली जनावरे चाऱ्याअभावी या अन्नाकडे आकर्षित होतात. नकळत जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यामुळे पोटफुगी आजार जनावरांमध्ये उद्भवतो. या आजाराची गंभीरता लक्षात घेणे जरुरी आहे. कारण बऱ्याचदा लवकर पचणारी कर्बोदके खाऊन अशी बरीचशी जनावरे पहिल्या ८ ते १० तासात उपयुक्त उपचाराअभावी दगावतात.
कारणे
गैरजबाबदारीने उकिरड्यावर टाकलेले समारंभातील उरलेले शिळे अन्न, नासाडलेली फळे या आजाराचे मुख्य कारण ठरतात. चाऱ्याची कमतरता आणि भुकेने त्रस्त जनावरे याकडे आकर्षित होऊन आणि हे अन्न खाऊन आजारास बळी पडतात.
बऱ्याचदा उन्हात वाळत घातलेले धान्य (गहू, तांदूळ, डाळी) सुद्धा फिरत्या जनावरांचे लक्ष वेधून ते खाल्ल्यामुळे या आजाराचे कारण ठरू शकते.
काही विशेष सणानिमित्त (पोळा, बेंदूर) शेतकरी आपल्या गाई, बैलांना आंघोळ घालून, रंगरंगोटी करून ओवाळून पुरणपोळी खाऊ घालतात. अशा सणानंतर पशू चिकित्सालयात पोटफुगी हा आजार झालेली जनावरे येतात. याचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले की पूर्वी पुरणपोळी खाऊ घालण्याचे प्रमाण एक किंवा दोन घरापुरते मर्यादित असे. आता हेच प्रमाण २५ ते ३० घरांपर्यंत वाढल्यामुळे अपचन होऊन जनावरे आजारी पडतात.
लक्षणे
जनावरे चारा खाणे थांबवतात. फुगलेल्या पोटावर हाताने दाब दिल्यास ‘खळ खळ’ असा आवाज येतो.
नाका-तोंडातून हिरवट द्रव स्रवतो.
जनावर शक्तिहीन होत खाली बसते. हळूहळू एका अंगावर झोपते. हे या आजाराचे अतिशय गंभीर लक्षण आहे.
वेळेवर आजाराची गंभीरता लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार न केल्यास जनावर या आजारास बळी पडतात.
उपाययोजना
आजारात जनावरांना खूप तहान लागते, तरी पाणी पिऊ द्यायचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागते. कारण जठारामध्ये अगोदरच पाण्याचा खूप मोठा साठा असतो. त्यामुळे फुफ्फुसांवर दाब पडून श्वसनाला त्रास होतो.
जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढच्या उपचारांसाठी आजारी जनावराला जवळच्या पशू चिकित्सालयात घेऊन जावे अन्यथा जनावर दगावण्याची शक्यता वाढते.
पशुतज्ज्ञ आजाराची पुढील चाचणी करून आधुनिक उपचार पद्धतीने जनावराचा प्राण वाचवण्यास प्रयत्नशील राहतो.
पशुवैद्यकीय मदत मिळेपर्यंत खाण्याचा सोडा १ ग्रॅम प्रति किलो वजनाच्या (गाईला ३०० ते ३५० ग्रॅम व शेळी किंवा मेंढीस २५ ते ३० ग्रॅम) प्रमाणात पाण्यात मिसळून पाजावे. हे मिश्रण पाजताना जनावराला ठसका लागू नये याची काळजी घ्यावी.
आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जनावरांना लवकर पचणारी कर्बोदके (गव्हाच्या पोळ्या, तांदूळ, शिजलेला भात, हॉटेल/समारंभातील उरलेले अन्न) खाण्यास प्रतिबंध करावा.
डॉ. विवेक कासराळीकर
९४४८५६८२४४
(प्राध्यापक, पशुचिकित्सा आणि उपचार विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, बिदर, कर्नाटक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.