Rural Development
Rural Development  Agrowon
यशोगाथा

Rural Development : केळी, कापसासह ग्रामविकासात हिवरखेड्याची झेप

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यात हिवरखेडा बुद्रुक हे गाव (ता. जामनेर) कांग नदीकाठी आहे. नदीत वाघूर धरणाच्या ‘बॅक वॉटर’चे (Waghur Dam Back Water) बारमाही पाणी असते. शिवारात मध्यम, काळी कसदार जमीन असून, सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र आहे. लोकसंख्या सुमारे साडेचार हजार आहे. जामनेर शहरापासून सुमारे सहा किलोमीटरवर महामार्गावर, तसेच जळगाव शहरही ३५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे वाहतूक. दळणवळण सोयींसाठी कमी कालावधी लागतो.

केळी शेतीत आघाडी

गावच्या शिवारात केळीची नजरेत भरणारी शेती आहे. या पिकाचे अर्थकारण पाहता कापसाखालील क्षेत्र कमी होत गेले. आजघडीला सुमारे १५०० हेक्टरवर विविध वाणांच्या केळीची लागवड दरवर्षी होते. पैकी उतिसंवर्धित रोपांची लागवड सुमारे २०० हेक्टरवर आहे. अनेक शेतकरी तीन ते चार टप्प्यांत लागवड करतात. जून व जुलैमधील मृग बहर, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कांदेबाग व फेब्रुवारी व मार्चमध्ये आंबे बहर असे नियोजन असते. एखाद्या बहरात नुकसान आल्यास ते अन्य बहरांतून भरून काढण्याचा प्रयत्न असतो.

दर्जेदार उत्पादन

अनेक शेतकरी ‘फ्रूट केअर’ तंत्र वापरून निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत. त्यातून जादा पदरात पडण्याची संधी असते. केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, गावाचे सुपुत्र तथा चाळीसगाव येथे कार्यरत तालुका कृषी अधिकारी प्रवीण विश्‍वनाथ महाजन यांचे मार्गदर्शन होते. थेट जागेवर खरेदी होते. केळीचे महत्त्व लक्षात घेऊन वाहतुकीसंबंधी मुख्य रस्तेही प्रशासनाने प्रशस्त केले आहेत. या पिकातून गावाला समृद्धी प्राप्त झाली आहे.

विक्रमी दर मिळविले

केळीला विक्रमी २९०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळवणारे शेतकरीही गावात आहेत. अलीकडील वर्षात सरासरी दर प्रति किलो ९ ते १० रुपये मिळाले आहेत. कोविड काळात दर कमी राहिले. शुभम महाजन, रवींद्र रोहमारे, अमोल चौधरी, जितेंद्र भिला पाटील, प्रकाश बाजीराव पाटील, उज्ज्वल महाजन, नितीन गोपाल महाजन, तेजस महाजन, अतुल महाजन, मोहन महाजन, अमोल सुधाकर पाटील, शिवाजी हरी पाटील, किरण महाजन आदी काही नावे प्रगतिशील शेतकरी म्हणून सांगता येतील. उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाणही शेतीत चांगले आहे.

शेतरस्ते व जलसंधारणात कामगिरी

दहा वर्षांपूर्वीच गाव केळी पिकात शंभर टक्के सूक्ष्म सिंचन करण्यात यशस्वी झाले. कापूस, मका व अन्य पिकेही ठिबकसह तुषार सिंचनाच्या मदतीने घेतली जातात. वाहतूक सुकर करण्यासाठी गावातील सर्व प्रमुख शेतरस्त्यांचे खडीकरणही लोकसहभागातून करण्यात आले आहे. काही शेतरस्त्यांचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यातून डांबरीकरणही झाले आहे. गावातील पाच नाल्यांचे गतकाळात खोलीकरण करण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यास मदत झाली. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरला.

‘लम्पी स्कीन’ लसीकरणात पुढाकार

जनावरांमध्ये लम्पी स्कीन रोगाची समस्या अलीकडे महाराष्ट्रात गंभीरपणे दिसून येते. त्या अनुषंगाने रोगाबाबतचे सर्वेक्षणही सुरुवातीला झाले. त्यामुळे समस्या गावात उद्‍भवली नाही. पशुधनाचे लसीकरणही करण्यात आले आहे. त्यासाठी पंचायत समितीचे सदस्य अमर पाटील यांनी आर्थिक मदत केली. स्वच्छतेकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते.

कापूस पिकातही आघाडी

गावात कापसाचे क्षेत्र केळीच्या तुलनेत कमी झाले आहे. सुमारे ११०० हेक्टरवर लागवड असावी. एकरी १० क्विंटल एवढी उत्पादकता आहे. गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्नही केले जातात. क्षेत्र डिसेंबरमध्येच रिकामे केले जाते. बेवडसाठी हरभरा, गहू, कलिंगड आदी पिके घेतली जातात. अलीकडील वर्षांत पाच हजांरापासून ते नऊ हजारांपर्यंत प्रति क्विंटल आणि २०२१ मध्ये सरासरी नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. थेट जागेवर विक्री होते.

पुरातन मंदिरे आणि धार्मिकता

गावात पुरातन राम व दत्त मंदिर आहे. दरवर्षी रामनवमी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते.

कांग नदीकाठी जागृत हनुमान मंदिरही आहे. राम मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार झाला.

अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होते.

गावचा विकास- ठळक बाबी

-गावात उच्चशिक्षित तसेच अधिकाऱ्यांची संख्या चांगली. काही जण परदेशात स्थायिक.

-विनोद प्रकाश पाटील जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पात सहायक अभियंता (श्रेणी १) पदी

तर गजानन बोरसे सहायक कामगार आयुक्तपदी कार्यरत.

-जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न. प्रोजेक्टर, संगणक आदी व्यवस्था.

-रा.आ. महाजन माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्याची व्यवस्था. शाळेचा ग्रामस्थांकडून विकास.

-शंभर टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण. शुद्ध पाण्याची (आर.ओ.) व्यवस्था. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत.

-स्वच्छतेत जिल्हास्तरावर चांगली कामगिरी. निर्मल ग्राम व ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर पुरस्कार.

लोकसहभागातून १०० टक्के वस्त्यांमध्ये काँक्रिटीकरण व अन्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला आहे. नवीन वसाहतींमध्येही विकासकामे पूर्ण करण्यावर भर आहे.
अमर पाटील सदस्य, पंचायत समिती, जामनेर ९६५७११५०५०
ग्रामपंचायतीने मूलभूत समस्या दूर करण्यावर सातत्याने भर दिला आहे. ग्रामस्थांची मदत असून, गावात सलोखा टिकून आहे.
शुभम महाजन ग्रामपंचायत सदस्य, हिवरखेडा ७७९८४७५३५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT