Mushroom Production Agrowon
यशोगाथा

Mushroom Production : पेठ तालुक्यातील महिला गटाची अळिंबी, शेतीमाल विक्रीतून प्रगती

Women Empowerment : खिरकडे (ता. पेठ, जि. नाशिक) येथील महिलांनी संघटित होऊन बचतीची कास धरली. गेल्या चार वर्षांत गटामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळत आहे. शासकीय यंत्रणांचे पाठबळ मिळाल्याने धिंगरी अळिंबी उत्पादन व विक्रीमध्ये गटातील महिला यशस्वी झाल्या.

मुकुंद पिंगळे

Success Story : नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी भागात भात, नागली, वरई, कुळीथ, उडीद, खुरासणी अशी जिरायती पिकांची लागवड असते. मात्र या शेती उत्पन्नातून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनंत अडचणी असतात. घरखर्च भागविणेही मुश्किलीचे होते. जिरायती हंगाम संपला, की रोजगारासाठी मोठे स्थलांतर होते.

त्यामुळे या भागातील दहा महिलांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची सुरुवात केली. स्व-भांडवल तयार करण्यासाठी महिलांनी दर महिन्याला शंभर रुपये प्रति सदस्य रक्कम बचत सुरू केली. यातून गटांतर्गत गरजू सदस्यांना पतपुरवठा सुरू झाला. दोन रुपये टक्क्याने व्याज परतावा स्वरूपात पतपुरवठा देण्यास सुरुवात झाली.

त्यातूनच बचत वाढत जाऊन गटाचे भांडवल वाढत गेले. आर्थिक शिस्त लागली, तसेच बचतीचे फायदे कळू लागल्याने प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. गटाने स्थानिक पातळीवर कृषिपूरक व्यवसाय उभारणी करण्याचे ठरविले.

सुरुवातीला गटाला उमेद (महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाले. स्थानिक संधीचा अभ्यास करून २०२० पासून गटाची वाटचाल सुरू झाली.

धिंगरी अळिंबी उत्पादनात माध्यम म्हणून वापरला जाणारा कच्चा माल भाताचे तणस, गहू भुस्सा स्थानिक पातळीवर मुबलक प्रमाणावर आहे. या सर्व बाजू अभ्यासून आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून धिंगरी अळिंबी उत्पादनासंबंधी आदिवासी महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग मिळाला. सुरुवातीला हे कामकाज घरगुती होते. मात्र गेल्या वर्षापासून एकत्रितपणे उत्पादन व विक्रीला सुरुवात झाली.

अळिंबी उत्पादनाला सुरुवात

महिला गटाला प्रशिक्षणातून अळिंबी उत्पादनात गुणवत्ता, विपणन पद्धती व बाजारातील संधी याची माहिती मिळाली. सुरुवातीला घरगुती पातळीवर कामकाज होऊ लागले. मात्र उत्पादनाच्या अंगाने गुणवत्तेत एकसारखेपणा नव्हता. त्यामुळे एकत्र येऊन अळिंबी उत्पादनाचे नियोजन केले.

अळिंबी उत्पादनासाठी २२ फूट बाय ३३ फूट आकारमानाचे शेड उभारणीसाठी गटाला चार लाखांचे अनुदान मिळाले. कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे कौशल्य आधारित प्रशिक्षण, बाएफ संस्था, मशरूम महासंचालनालय (सोलन-हिमाचल प्रदेश) येथे ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन नव्या संधींचा अभ्यास गटाच्या सदस्यांनी केला.

कामाची दिशा स्पष्ट झाल्याने सर्वच सदस्यांचा आत्मविश्‍वास वाढला. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी निर्माण झाल्याने काही प्रमाणात हंगामी स्थलांतर थांबले. शिवाय महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या.

गटाला कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो. गटाच्या अध्यक्षा आणि सचिव नोंदी, हिशेब ठेवतात. बाकी सर्व सदस्या एकत्रित प्रत्यक्षात उत्पादन आणि विपणन कार्यात सहभागी असतात. तणस, गहू भुस्सा यांची स्थानिक पातळीवर उपलब्धता असल्याने वेगळा खर्च करावा लागत नाही. अळिंबी बियाणे नाशिक येथील चेतना किरण पवार यांच्याकडून १०० रुपये प्रति किलोप्रमाणे उपलब्ध होते.

गटाच्या अध्यक्षा आश्‍विनी छगन नाठे, सचिव लक्ष्मीबाई मोहनदास नाठे यासह सोन्याबाई उत्तम नाठे, पुष्पाबाई सुरेश नाठे, रंजना संजय भोये, सुमन मनोहर नाठे, नर्मदाबाई दशरथ नाठे, कविता हरिश्‍चंद्र नाठे, उषाबाई गंगाधर नाठे, मालतीबाई मोहन ठाकरे यांचा अळिंबी उत्पादनात सक्रिय सहभाग असतो. सध्या गटाला तीन महिन्यांत पाच क्विंटल अळिंबी उत्पादन मिळते. प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करून अळिंबी रोल, सूप, पापड, लोणचे, बिस्कीट

निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन उत्पादन सुरू करण्याचे गटाचे नियोजन आहे. नाशिक बाजारपेठेमध्ये उत्पादनाच्या विक्रीचे प्रयत्न सुरू आहेत.

महिला गटाला विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे, तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख यांचे मार्गदर्शन मिळत असते.

अळिंबी तसेच शेतीमालाची विक्री

उत्पादित अळिंबीची विक्री स्थानिक पातळीवर पेठ, करंजाळी यासह नाशिक शहरामध्ये केली जाते. याशिवाय गोदाई प्रदर्शन, आत्मा कृषी महोत्सवात गटातर्फे अळिंबी विक्री केली जाते. ग्राहकांची मागणी अभ्यासून नागली, तांदूळ, वरई, तूर, उडीद, कंदमुळांची देखील विक्री केली जाते.

आकर्षक पॅकिंग करून अळिंबी विक्री होते. अळिंबीला सरासरी २०० ते २५० रुपये प्रति किलो दर मिळतो. धान्य तसेच अळिंबी विक्रीतून महिलांना शेतीसाठी काही प्रमाणात भांडवल उपलब्ध झाले आहे. पहिल्या वर्षी गटाची अकरा हजारांची उलाढाल झाली होती. आत वार्षिक उलाढाल लाखांवर पोहोचली आहे.

संपर्क : आश्‍विनी नाठे, ९०२२०३५५६८ (अध्यक्षा, सावित्रीबाई फुले महिला बचत गट)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT