Milind Vaidya in rice field
खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या जमिनीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षी दीड एकरावर सुधारित आणि २० गुंठ्यावर संकरित भात जातीच्या लागवडीचे नियोजन केले आहे. सुधारित जातीचे दिड एकरासाठी ३६ किलो बियाणे आणि २० गुंठे क्षेत्रासाठी संकरित जातीचे ५ किलो बियाणे वापरणार आहे. दरवर्षी दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करतो.
मुख्य शेतात रोप लागवडीपूर्वी पुरेसे शेणखत मिसळून देतो. दीड एकराला २५ किलो युरिया आणि २० किलो शेंगदाणा पेंड मिसळून चिखलणीकरून रोप पद्धतीने लागवडीचे नियोजन असते. यंदा पावसाच्या अंदाजानुसार ७ जून ते १५ जूनच्या दरम्यान रोपवाटिकेत बियाणे पेरणार आहे. साधारणपणे १८ ते २१ दिवसांची रोपे लागवडीसाठी निवडतो. जास्त पाऊस असेल तेव्हा पारंपरिक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर चारसुत्री पद्धतीने लागवडीचे नियोजन असते. मी साधारणपणे २५ सें.मी. बाय १५ सें.मी. अंतरावर लागवड करतो. एका चुडात सुधारित जातीची ३ रोपे आणि संकरित जातीचे एक रोप लावतो. लागवडीनंतर २५ दिवसांनी दीड एकरातील भात पिकाला २५ किलो युरिया देतो. त्यानंतर पीक पोटरीत असताना १५ः१५ः१५ हे खत २५ किलो या प्रमाणात देतो. त्यामुळे पीक वाढीला चांगला फायदा होतो. गरज असेल तर पिकाला संरक्षित पाणी देतो. प्रादुर्भाव लक्षात येताच कीड,रोग नियंत्रणावर माझा भर असतो. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढण्यासाठी भात शेतीमध्ये मी दरवर्षी शेंगदाणा पेंड आणि शेण स्लरीचा वापर करतो. त्याचा चांगला परिणाम पीक उत्पादनावर होतो. योग्य व्यवस्थापनामुळे भाताचे गुंठ्याला सरासरी १५० किलो उत्पादन मिळाले आहे. दरवर्षी दहा गुंठे क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने देखील भात लागवडीचे नियोजन करतो. या पद्धतीमुळे मशागतीचा खर्च आणि खत वापरात ५० टक्के बचत होते. पिकाचे उत्पादनही चांगले मिळते. पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावरही फारसा परिणाम होत नाही. दरवर्षी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरित जातींची निवड, संतुलित पद्धतीने सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर आणि काटेकोर पीक व्यवस्थापनावर माझा भर असल्याने अपेक्षित पीक उत्पादन मला मिळते. - मिलिंद वैद्य , ०२३५७-२४३१४८