Rain Agrowon
हवामान

Rain Forecast : वादळी पावसाचे सावट दूर होणार

Rain Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाच्या निरोप घेतल्यानंतही महाराष्ट्राच्या विविध भागांत आठवडाभरापासून वादळी पावसाने तडाखा दिला आहे.

Team Agrowon

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाच्या निरोप घेतल्यानंतही महाराष्ट्राच्या विविध भागांत आठवडाभरापासून वादळी पावसाने तडाखा दिला आहे. कमी वेळात होणाऱ्या दमदार पावसामुळे खरिपाची पिके वाहून गेली असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उद्यापासून (ता. २४) वादळी पावसाचे सावट दूर होणार असल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

यंदा मॉन्सून हंगामात राज्यात दमदार पाऊस कोसळला. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात तब्बल २६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यातच मॉन्सून परतल्यानंतरही पावसाला पोषक प्रणाली तयार झाल्या. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालींमुळे राज्याच्या विविध भागांत तुफान वादळी पाऊस कोसळला. या पावसामुळे काढणीस आलेली पिके वाया गेल्याने, कांद्यासह रब्बी हंगामातील पिके, फळबागा, भाजीपाला पिकांना तडाखा बसल्याने 'आता थांब रे बाबा...! ' म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्यात सुरू असलेला नुकसानकारक वादळी पाऊस आता थांबण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. याबाबत बोलताना हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, की उद्यापासून (ता. २४) महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळू शकते. परंतु शनिवार (ता.२६) ते मंगळवार (ता.२९) ऑक्टोबरपर्यंतच्या चार दिवसांत दक्षिण अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते. एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते असेही श्री. खुळे यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल

सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते. तसेच अजूनही ‘ला- निना’ दृष्टिपथात नाही. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता वाढली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती, अकोला या भागांत थंडीला सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही. एक नोव्हेंबरनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते. जोपर्यंत ‘ला- निना’ अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते, असे वाटते. ‘ला- निना’च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या वेळी स्पष्ट करता येईल, असेही हवामान तज्ज्ञ श्री. खुळे यांनी सांगितले.

उपसागरात उद्या घोंघावणार चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र (डिप्रेशन) झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज (ता. २३) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ उद्या (ता. २४) रात्री उशिरा ओडिशाच्या पुरी आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटादरम्यान जमिनीला धडकण्याची शक्यता आहे. किनाऱ्याला धडकताना हे चक्रीवादळ तीव्र होणार असून, ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा महाराष्ट्राला धोका नसून, कोणतीही हानी होणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

SCROLL FOR NEXT