Street Dog
Street Dog Agrowon
संपादकीय

भटक्या कुत्र्यांची समस्या कधी सुटणार?

- डॉ. व्यंकटराव घोरपडे

पूर्वार्ध

महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतेच माहिती अधिकारात रेबीज या श्‍वानदंशांमुळे (Dog Bite) होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०२०-२१ मध्ये नोंद झालेल्या रेबीज रुग्णांची (Rebiz) संख्या २६८० आहे जी सन १९-२० मधील नोंद झालेल्या १२९६ संख्येच्या जवळपास दुप्पट आहे. म्हणजेच रुग्णांत शंभर टक्के वाढ झालेली आढळून आले आहे. याला एकमेव कारण वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांची (Stray Dog) संख्या हेच आहे.

आजकाल आपण माध्यमातून नियमितपणे वाचतो, राज्यांमध्ये नागपूरपासून हिंगोली, कराड, कोल्हापूर, पुणे, सातारा, पालघर या ठिकाणी आणि देशात देखील हैदराबाद, जयपूर, कोचिन, त्रिवेंद्रम अशा मोठ्या शहरातून दिवसाआड कुत्रे चावल्याच्या घटना समोर येतात. साधारणपणे वर्षाला २० हजार व्यक्तींचा मृत्यू हा रेबीज मुळे होतो. त्यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जगाच्या तुलनेत आपल्या देशात जवळजवळ ३६ टक्के अधिक मृत्यू हे रेबीजमुळे होताना दिसतात. हे सर्व भयंकर आहे आणि महत्त्वाचे म्हणजे केलेल्या उपाययोजनांना देखील कमी पडताना दिसतात. दिवसेंदिवस रुग्ण संख्याही वाढत चालली आहे.

केंद्र सरकारने २०३० पर्यंत या रेबीज रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यासाठी लोकसहभाग आणि उपाय योजनांमधील सातत्य हे फार महत्त्वाचे असल्याचे दिसून विवेचनावरून दिसून येते. माध्यमातील श्‍वानदंशाच्या बातम्यांचा मागोवा घेतला, तर त्यावर नेमक्या पणाने उपाययोजना होताना दिसत नाहीत. तात्पुरते उपाय केले जातात. त्याचे दूरगामी परिणाम मिळणारे यश हे गुलदस्त्यात राहते. पुन्हा मग अशा प्रकारच्या श्‍वानदंशाच्या बातम्या या येत राहतात, चर्चा होते. एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. टोकाची भूमिका घेतली जाते. मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची हत्या केली जाते. तथापि, त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. पण मूळ समस्या ही त्याचं ठिकाणी राहते. भटक्या कुत्र्याची संख्या कमी करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे. शासकीय विभाग, सेवाभावी संस्था, प्राणी मित्र, श्‍वानप्रेमी पालक, शासकीय - खासगी पशुवैद्यक, आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे शक्य होणार आहे. त्याची जाणीव करून देताना मात्र संबंधित कुठेतरी कमी पडताना दिसतात. अन्यथा, श्‍वानदंश रुग्णाच्या संख्येत मोठी घट झालेली आढळली असती.

भटक्या कुत्र्यांची संख्या का वाढते?

आपल्या देशात जवळपास ३० दशलक्ष भटक्या कुत्र्याची संख्या आहे. साधारणपणे २२ हजार वर्षांपूर्वीपासून हे श्‍वान माणसाळले गेले आहेत. त्याचा उपयोग, वापर याप्रमाणे त्यांचे संवर्धन सुरू झाले. काही जाती शिकारीसाठी, राखणीसाठी तसेच शेळ्या-मेंढ्या, जनावरे चरायला गेल्यानंतर त्यांच्या नियंत्रणासाठी चांगले आहेत हे जाणवल्यावर या श्‍वान प्रजाती संवर्धित करून वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या. मनुष्य प्राण्याने त्यांचा खुबीने वापर सुरू केला. एकमेकांना मदत करत, एकमेकांच्या गरजा भागवत त्यांचे संवर्धन होत गेले. संख्या वाढत गेली.

भटकी कुत्री ही साधारण तीन गटात मोडतात. एक म्हणजे मोकळेपणे फिरणारे जे कुणावरही अवलंबून नसतात, सोसायटीमधील व जवळपासचे लोक त्यांना खायला घालतात त्यात त्यांचे भागते. दुसरा प्रकार हा सुद्धा मोकळ्यापणाने हिंडतो फिरतो पण तो सोसायटीमधील जवळपासच्या लोकांच्या खाऊ घातलेल्या खाण्यापिण्यावर अवलंबून न राहता स्वतः खाद्य शोधून खातो. कचराकुंडी, एखाद्या हॉटेल जवळचे टाकाऊ अन्न, कुक्कुट - मटणाची दुकाने या ठिकाणी अन्न शोधून खातो आणि भटकत राहतो. तिसरा प्रकार हा जे श्‍वान पाळीव असतात, पण काही कारणाने त्यांना सोडून दिलेले असते. त्यामुळे त्याला अन्नशोधणे, भटकणे जमतच असे नाही. त्यामुळे तो अपघाताने किंवा दूषित, खराब अन्न पाणी पिऊन मरतो किंवा जायबंदी होतो. २०२०-२१ च्या ‘स्टेट ऑफ पेट होमलेस इंडेक्स रिपोर्ट’नुसार देशातील जवळ जवळ ५० टक्के लोकांनी कधी ना कधी आपल्या पाळलेल्या कुत्र्याला सोडून दिले असल्याचे म्हटले आहे. हेच प्रमाण जगात २८ टक्के आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारच्या श्‍वानामुळे देशात भटक्या कुत्र्यांची संख्या ही वाढलेली दिसून येते.

कुत्र्याचा एकूणच गर्भार काळ हा दोन महिन्यांचा आहे. त्यामुळे दोन महिन्यांत या कुत्र्यांची पिलावळ वाढत जाते. आणि त्या संबंधित क्षेत्रात त्यांची संख्या मूळ पदावर यायला मदत होते. त्याचबरोबर एक मादी श्‍वान सात वर्षांत उत्पादित मादी पिलांच्या उत्पादनासह जवळपास ७८ हजार पिलांना जन्म देते. यावरून आपल्या लक्षात आले असेल, की या भटक्या कुत्र्यांची संख्या कोणत्या वेगाने वाढत जाते.

प्रत्येक क्षेत्राच्या भटक्या कुत्र्यांची धारणक्षमता ही वेगवेगळी असते. ती त्या क्षेत्रातील खाण्यापिण्याची उपलब्धता, एकूण क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. त्यामध्ये कधीही सहसा बदल होताना दिसत नाही. उपाययोजना केल्या तरीही ती संख्या साधारणपणे तितकीच राहते. वाढलेल्या संख्येमधील काही श्वान पिल्लं अन्न पाण्याशिवाय मरतात. प्रौढ श्‍वान हे आसपासच्या भागातील कुत्र्यांशी लढतात, जखमी होतात, मरतात किंवा मग त्यातूनच रेबीज या भयंकर रोगाचा प्रसार सुरू होतो. रेबीज कुत्रा जर चावल्यानंतर योग्य उपचार मिळाले नाहीत आणि लक्षणे दिसायला लागली तर मृत्यू हा ठरलेलाच आहे. रेबीज झालेला कुत्रा हा काहीही कारण नसताना चावट सुटतो आणि ज्याला चावतो त्याला रेबीज होण्याची शक्यता वाढते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार रेबीजने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत आपला जगात द्वितीय क्रमांक आहे. यामुळे आपण उच्च जोखीम क्षेत्रात (हाय रीस्क झोन) येतो. परिणामी जगातील अमेरिकेसारख्या रेबीज मुक्त देशांनी आपल्या देशातील श्वान आयातीवर बंदी घातली आहे. या निर्यातबंदीमुळे वाढलेल्या श्‍वानांची आपण कितपत संरक्षण व देखभाल करू शकतो, हे देखील महत्त्वाचे आहे. या सर्वांवर आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने व नियमांचे पालन करत नसबंदी करणे, लसीकरण करणे यासह अनेक उपाययोजनांबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करावी लागेल. अन्यथा, आपल्याला ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

(लेखक सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT