Agriculture Weather Agrowon
संपादकीय

Climatic Advice for Agriculture : ‘सल्ला’च टिकवणार शेती

Article by Vijay Sukulkar : वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी शेतीचे नुकसान वाढत असताना शेतकऱ्यांना हवामान आधारित योग्य सल्ला वेळेत मिळाला नाही तर या देशातील शेती उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.

विजय सुकळकर

Agriculture Weather Advisory : हवामान बदलाच्या चरम सीमेवर आपण आहोत. या काळात पाऊस खूपच अनियमित झाला आहे. त्यामुळे एकतर दुष्काळ नाहीतर अतिवृष्टीचा फटका शेतीला बसतोय. समुद्री वादळांचे प्रमाण वाढल्याने होणाऱ्या वादळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) नियमित हवामान अंदाज वर्तवित असते. परंतु यातील बहुतांश अंदाज चुकतात. जे अंदाज बरोबर असतात, तेही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. मुख्य म्हणजे हवामान अंदाज वर्तविल्यानंतर त्याचे विभागनिहाय शेत पिकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात विश्‍लेषण करून शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देण्याची ‘आयएमडी’ची अशी स्वतंत्र यंत्रणा नाही.

सध्या आयएमडीच्या हवामान अंदाजाचे विश्‍लेषण करून कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ प्राप्त हवामान परिस्थितीत पीक सल्ला देतात. याशिवाय काही खासगी संस्था शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन हवामान अंदाजावर आधारित सल्ला देतात.

अधिक गंभीर बाब म्हणजे हवामान बदलाच्या काळात अंदाजात अधिकाधिक अचूकता येण्याबरोबर त्याचा पिके, पशुधनासह एकंरदीतच शेतीवर परिणामाचे विश्लेषण करून योग्य तो सल्ला शेतकऱ्यांना तत्काळ मिळणे अपेक्षित आहे. नेमक्या अशावेळी जिल्हा हवामान आधारित सल्ला केंद्रे बंद करण्यात येत आहेत.

हवामान बदलाच्या या काळात हवामानात सर्वाधिक तफावत असलेल्‍या जिल्ह्यांचा अभ्यास करून त्याआधारे देशात १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रे उभारण्यात आली होती. महाराष्ट्रात त्यातील ११ केंद्रांचा समावेश आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या केंद्रांनी संबंधित जिल्हा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या केंद्रांनी चांगले काम केले आहे.

प्रतिकूल हवामान अंदाजास पूरक तसेच बदलत्या हवामानास अनुकूल सल्ले देऊन पिके वाचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या हवामान आधारित सल्ल्यांचा या देशातील शेतकरी तसेच कृषी विभाग, आत्मा, उत्पादक कंपन्या याशिवाय अनेक सेवाभावी संस्था-संघटनांना फायदा झाला आहे.

असे असताना केंद्र सरकारने अशा केंद्रांच्या निधीलाच कात्री लावल्याने आयआएमडीला ही केंद्रे बंद करावी लागत आहेत, ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल. मागील काही वर्षांपासून शेतीसंबंधात अनेक योजनांच्या निधीला केंद्रातून कात्री लावली जात आहे. बहुतांश क्षेत्रात केंद्र सरकार खासगीकरणाला प्राधान्य देत आहे.

प्रत्येक क्षेत्रात सल्ला असो की सेवा ही पैसे घेऊनच देण्यावर त्यांचा भर दिसतो. यातून शेती क्षेत्रही सुटताना दिसत नाही. हवामान अंदाज वर्तविण्यापासून ते त्यावर आधारित कृषी सल्ला काही खासगी संस्था शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन देण्याचे काम देशात यापूर्वीच सुरू झाले आहे.

आयएमडी अंतर्गत असलेली हवामान आधारित सल्ला केंद्रे बंद करण्यामागे देखील त्यांचे खासगीकरण करण्याचा हेतू दिसतो. भारतीय शेतीत हवामानाचा अंदाज आणि त्याआधारित सल्ले हा खूपच संवेदनशील विषय आहे. निविष्ठा उत्पादक कंपन्या खासगी हवामान संस्थांकडून उलटसूलट अंदाज वर्तवून आपले उखळ पांढरे करून घेतात, असे सर्रासपणे बोलले जात असून त्यात तथ्यही आहे.

अशावेळी या देशातील शेती टिकवायची असेल तर ‘आयएमडी’ला अधिक सक्षम करावे लागेल. आयएमडी अंतर्गत हवामान आधारित सल्ला केंद्रे देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभे राहायला हवेत. या केंद्रांचा पिके, पशुधनासह इतरही आवश्यक सल्ला हा संबंधित जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मोफत कसा पोहोचेल, हे देखील पाहायला हवे.

हवामान आधारित सल्ला केंद्र बंद करू नयेत, अशी मागणी त्यांच्या संघटनांकडून होतेय. यावर गांभीर्याने विचार करून ती चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवा. असे झाले तरच हवामान बदलाच्या काळात या देशातील पिके वाचतील, पर्यायाने शेती आणि शेतकरीही टिकेल, अन्यथा नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT