China Raisin Smuggling: विस्तारवादाने पछाडलेला देश, अशी चीनची ओळख आहे. विस्तारवादातूनच भारतासह अनेक शेजारील देशांत चिनी ड्रॅगनची अनधिकृत घुसखोरी सुरू आहे. क्षेत्र विस्ताराबरोबर दुय्यम दर्जाच्या परंतु स्वस्तातील चिनी उत्पादनांनी जगभरातील बाजारपेठा घुसखोरी करूनच काबीज केल्या आहेत. अशाच प्रकारच्या घुसखोरीतून चीनचा सुमारे पाच हजार टन बेदाणा बेकायदेशीररीत्या भारतातील बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनधिकृत एचटीबीटी बियाण्यानंतर आता देशातील शेतीमाल बाजारातही घुसखोरी पाहावयास मिळत असून ही बाब अतिगंभीर आहे.
कृषी निविष्ठा असो की शेतीमाल बाजार सरळमार्गाने भारतातील बाजारपेठांत प्रवेश मिळत नसेल तर थेट घुसखोरी करा, असा संदेश यामुळे जगभर पोहोचत आहे. देशातील प्लँट क्वारंटाईन या कायदेशीर व्यवस्थेचे देखील हे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बेदाणे आयातीमुळे येथील बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम तर होतोच, शिवाय देशात घातक अशा नव्या कीड-रोगांचा प्रवेश होण्याची शक्यताही आहे.
चीनमधील बेदाणा निकृष्ट दर्जाचा आहे. चीन व इराणचा बेदाणा पाकिस्तानमध्ये आणून अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये घालून भारतात आणला जात आहे. हा बेदाणा आरोग्यासाठी चांगला नसल्याचेही यातील जाणकारांचे म्हणणे आहे. ट्रेड अँड टेरिफ वॉरच्या जमान्यात अशी आयात धोकादायक म्हणावी लागेल. शिवाय ही आयात कर चुकवून होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारच्या बेकायदा आयातीमुळे देशांतर्गत बेदाण्याचे दर कोसळून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
चीनमधून बेदाणा आयातीची भनक दोन महिन्यांपूर्वीच लागली होती. राज्यातील शेतकरी चीनमधून येणाऱ्या बेदाण्यावर बंदी घालण्यासाठी दीड-दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. अशा मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चे काढून या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून चीनमधून होणारी ही बेकायदा आयात थांबविण्याची मागणी केली होती. परंतु केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
महाराष्ट्रासह देशभरातील द्राक्ष शेती नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत सापडलेली आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातील ३० टक्के बागा नैसर्गिक संकटांनी उध्वस्त झाल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती देशभर आहे. अशावेळी बेकायदा बेदाणे आयातीसारख्या मानवनिर्मित संकटांची भर भडली तर येथील द्राक्ष - बेदाणा उत्पादक नष्ट होतील. ही बाब लक्षात घेऊन चीनमधील बेकायदा बेदाणे आयात केंद्र सरकारने तत्काळ थांबवायला हवी.
बेदाणे आयात करणारे शोधून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवेत. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाची देखील अशीच मागणी आहे. राज्य सरकारने केवळ पत्रव्यवहारावर न थांबता बेदाणे आयात बंदीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला हवा. देशात आयात झालेला बेदाणा खुल्या बाजारात पोहोचण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून कसून तपासणी व्हायला हवी.
शिवाय बंदरे, विमानतळे, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास यंत्रणा अधिक कार्यक्षम करायला हवी. अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक बेदाण्याची मागणी वाढत आहे. त्यात इराण आणि तुर्की या प्रमुख निर्यातदार देशातून निर्यात घटत असताना आपला दर्जेदार बेदाणा जगभरच्या बाजारपेठेत पाठविण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे. अशावेळी कमी प्रतीचा, आरोग्यास हानिकारक बेदाण्याची अनधिकृत आयात आपल्याला थांबवावीच लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.