Agriculture
Agriculture Agrowon
संपादकीय

बोगस बोंब नव्हे, लुटारूंचा कांगावा

अनंत देशपांडे

अनंत देशपांडे

मागे एका प्रथितयश दैनिकात शेतकऱ्‍यांवर बरेच तोंडसुख घेतले होते. शेतकरी नुकसानीबद्दल नेहमीच बोंबलत असतात. ज्या वर्षी शेतीत चांगलं पिकतं त्या वर्षीची कमाई ते सोने खरेदीवर उडवतात. पिकलेल्या वर्षीची कमाई नापिकीच्या वर्षासाठी वापरली, तर मदत करा, कर्जमाफी द्या, अनुदाने द्या, अशा बोंबा मारण्याची गरज पडणार नाही.

ही बळीराजाची बोगस बोंब आहे, सरकारने शेतकऱ्‍यांच्या बोंबलण्याकडे दुर्लक्ष करावे. शेतकरी कोणत्याही प्रकारचा कर भरत नसतात. करदात्यांनी भरलेल्या रकमेतून त्यांना मदत करणे थांबवले पाहिजे. शेतकऱ्‍यांच्या अडचणी आणि शेतीतील धोक्यांचा अभ्यास न करता, असे व्यक्त होणे हे त्या दैनिकाचेच मत नाही, तर समस्त उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांचेही आहे. शेतकरी फुकटे, दारूबाज, अडाणी, कर्ज काढून पोरींचे लग्न करणारे, ऊठसूट तालुक्याच्या गावी जाणारे, लफडी करणारे, चैन करणारे म्हणून टिंगलटवाळी करणारी मध्यमवर्गीय मानसिकता फार जुनी आहे.

केवळ कष्ट, कष्ट आणि कष्ट...

परवा मी नदीवडी, ता. निलंगा येथे माझे मित्र शिवाजी पाटील यांच्याकडे गेलो होतो. माझे चांगले मित्र, राजकारणात गेले असते किंवा ठरवले असते, तर करोडपतीही झाले असते आणि मोठ्या राजकीय पदावर आसनस्थ झाले असते. सज्जन आणि हुशार ग्रहस्थ, अर्थशास्त्र आणि राजकारणाचे चांगले जाणकार. शेतीवर प्रचंड प्रेम करतात, म्हणून शेतातच अडकले. दोन दिवस मी त्यांचे कुटुंबीय आणि ते काय काय करतात ते पाहत होतो. त्यांची चार जागी तुकड्यांत विखुरलेली चाळीस एकर शेती आहे.

(डाव्याच्या भाषेत गावातले अंबानी) मोठे शेतकरी, दोन मुलं, ते स्वतः आणि एक सालदार नोकर मिळून शेती करतात. नातूही अलीकडे शिकत शिकत त्यांना मदत करतो. शेती गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. अनेक कूपनलिका घेऊन झाल्या, पाण्याने टांग मारली, खर्च वाया गेला. दहा बारा वर्षांपूर्वी मोठे कर्ज काढून नदीवरून दोन, तीन किलोमीटर पाइपलाइन केली, पण अपवाद वगळता नदीला पाणीच थांबले नाही. बँकेचे काढलेले कर्ज आणि व्याज कोरडवाहू पिकांच्या उत्पादनातून भरावे लागले.

अनेक वर्षांच्या खंडानंतर धनेगावच्या धरणात पाणी साठले म्हणून नदीला पाणी आले. जुनी पाइपलाइन कामाला आली. या वर्षी चार एकर ऊस लावला. कुटुंबात एक मोटरसायकल आहे. पहाटेपासून कामाची लगबग चालू होते. न्याहारी, दुपारचं जेवण, घरून शेताकडे जाणे-येणे, अचानक लागणाऱ्‍या वस्तूंची ने-आण करणे, बाजार गावाला जाणे, लाइटच्या लहरीप्रमाणे मोटर चालू बंदवर लक्ष ठेवणे, पाहुण्या मित्रांचे कार्यक्रम उरकणे, या सर्व कामांसाठी मोटरसायकल अपुरी पडते. मोबाईलमुळे एकमेकांशी संपर्क करणं सोपं झालं असलं, तरी धावपळ व्हायची ती होतेच. घरातील तीन ते चार गडी आणि एक सालदार गडी दिवसरात्र कामात व्यस्त असतात.

डोळ्यांसमोर होत्याचे नव्हते होते

फिरत मळ्यात गेलो, ऊस पाण्याला आलेला होता. या वर्षी पाऊस सलगपणे पडला म्हणून मध्यंतरी नदीवरील मोटर काढली, आता पावसाने उघडीप दिली, त्यामुळे मोटर बसवायची आहे. नदीपर्यंत वाहन जात नाही, माणसांनी ती उचलून न्यावी लागते. याकरिता पाच-सहा माणसांची गरज असते.

मळ्यातील सोयाबीन पावसाअभावी सुकायला लागलंय, त्याला विहिरीवरील स्प्रिंकलरने पाणी चालू केलंय. पाऊस नाही आला तर बाकीच्या तुकड्यांतील सोयाबीन कितपत हाती लागेल माहिती नाही. म्हशी आणि बैलांना वेळच्या वेळी चारा-पाणी करावे लागते. दोन एकर सोयाबीन खूप पातळ झालंय. त्याला पाळी घालायचीय, पाळी घातल्यानंतर पाऊस नाही पडला, तर ओल उडून जाऊ शकते.

त्यामुळे रब्बीचे पीक उगवण्याची शक्यता मावळते. घाई करावी लागणार असते. पुढे शेंडेपावसाचे प्रमाण वाढू शकते त्याची चिंता असतेच. मध्येच शिवाजीराव यांना चार दिवस गावाबाहेर जावे लागले. मुलं आणि सालदार गडी शेतीच्या अन्य कामांत गुंतल्यामुळे सोयाबीनकडे दुर्लक्ष झाले. कीडनाशके फवारायला उशीर झाला.

सोयाबीन पीक अळ्यांनी खाल्ले, तीस चाळीस टक्के नुकसान झाले. हरणांचे कळप, लाइटच्या लहरीप्रमाणे रात्रीअपरात्री शेताला पाणी देणे, शेतात निघणारे विंचू, साप आदींपासून असुरक्षितता, डुकरांच्या झुंडी, गोगलगाई, तुडतुडे, मोर, उंदीर, पाखरं आदींपासून पिकांचे संरक्षण, अतिवृष्टी, उघडीप, अवेळी पडणारा पाऊस, न पडणारा पाऊस, वादळ, गारपीट, यांपैकी कोणत्या आपत्तीला कधी सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. बघता बघता डोळ्यांसमोर होत्याचे नव्हते होऊन जाणे हा त्यांचा नित्याचा अनुभव आहे.

एवढी क्रूर मानसिकता कशी तयार होत असावी?

शेती बंद दाराआड केला जाणारा उद्योग नाही. उत्पादन किती येईल, त्याला भाव काय मिळेल, हाती किती पैसे लागतील काही भरवसा नाही. हे वास्तव मध्यमवर्गीयांना सांगणार कोण? नैसर्गिक आपत्तीचा दणका केवळ शेतकऱ्‍यांनी सोसावा आणि आम्हाला स्वस्तात धान्य उपलब्ध करून द्यावे. ही क्रूर मानसिकता कशामुळे तयार होत असावी?

सुरक्षित पगार, वरकमाई, महागाई भत्ते, दारात गाड्या, इंग्रजी शाळेत शिकणारी मुलं असे सुखवस्तू मध्यमवर्गीय, वीकएण्डला हजारोंची उधळण करतात. त्यांना हे कसं सांगायचं, की अरे बाबांनो, या माझ्या शेतकरी मित्रासाठी सहकुटुंब फिरायला जाणे ही चैन आहे, आयुष्यात तो एकदाही बायकोसोबत बाहेर पडला नाही. कोणते व्यसन नाही, अतिरिक्त खर्च नाही, चांगले उत्पादन सातत्याने घेतो. आवश्यक असून अद्याप त्याला घर बांधता आले नाही.

स्वप्नांचा चुराडा

दोन्ही मुले शेतीच्या बाहेर पडली नाहीत, ही सल मनात असलेल्या या मित्राने नातवंडांना शिकवण्यासाठी लातूरला भाड्याने घर घेतले. एक नात बेसबॉल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेली चांगली खेळाडू, तिला तिकडे भविष्य असेलही, पण ती रिस्क परवडत नाही म्हणून विज्ञान शाखेत घालावे लागले. अन्य नातवंडांचीही काही स्वप्नं असतील. शेतकऱ्‍यांना आर्थिक मर्यादेत राहूनच भविष्याचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना स्वप्ने बघण्याचा हक्क नाही. आपल्या मुला-नातवंडांच्या स्वप्नांचा चुराडा होताना बघणे क्लेशकारक असले, तरी त्या डागण्या सोसत आयुष्य कंठावे लागते. देशातील करोडो शेतकरी असेच जगतात.

माफक अपेक्षा

एवढे आघात सहन करूनही माझा मित्र तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही, कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई काही काही मागत नाही, केवळ स्वातंत्र्य मागतोय. मला माझ्या मर्जीप्रमाणे शेती करू द्या, माझ्या मर्जीप्रमाणे माझा माल विकू द्या, माझ्या शेतात मर्जीप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान वापरू द्या.

मध्यमवर्गीय नागरिकांना धान्य स्वस्तात मिळवून देण्यासाठी सरकारने माझ्या शेतीमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान करू नये. एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे. शेतात भरभरून पिकले, तर खुशाल माझ्या मालाचे भाव पडू द्या, तुम्ही स्वस्त घेऊन खा. पण माझ्याकडेच कमी पिकले आणि माल थोडा महाग झाला, तर तुम्ही ओरडून सरकारवर दबाव आणू नका, काही दिवस थोडे महाग घेऊन खा. ही माझी बोगस बोंब नाही, तुम्हीही विनाकारण कांगावा करू नका.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT